बुधवार, २५ जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - 3


                 वेळ सकाळची 6 वाजताची ...  मनालीतल्या हॉटेलखाली  गाड्यांवर सामानाची बांधाबांध चालू होती ... ह्या प्रवासातील सगळ्यात कंटाळवाण  काम म्हणजे  सामान  गाड्यांवर  बांधणे ... विंचवाचं  बिऱ्हाड , दुसरं  काय  ...!! त्यातल्या त्यात पप्याच्या गाडीवरची bag  बांधणे  म्हणजे  महाकठीण ....! त्याची भली मोठी bag मागील सीट  वर दोरीने  आडवी बांधावी लागे .... त्याला बराच वेळ जात असे ... इतर bags कॅरियर वर ठेऊन इलास्टीकची जाळी ओढून  हुकांमध्ये अडकवली कि काम भागत असे ... शेवटी निघण्यासाठी गाड्या तयार झाल्या .
                 इतके दिवस चाललेली net  practice  आज संपणार होती ... आता खरी match सुरु होणार होती .... निसर्गाच्या  गुगल्या ,  बाउंसर आणि यॉर्कर विरुद्ध आम्हाला आमच्या विकेट्स टिकवून ठेवायच्या होत्या ... थोड्या वेळातच आता निसर्गाचा power play  सुरु होणार होता ... तो किती काळ चालेल  हे फक्त त्याच्याच हातात होतं . त्या power play  मध्ये सांभाळून खेळणं एवढंच  आमच्या हातात होतं ....  आम्ही रोहतांग च्या दिशेने निघालो ...


                   सकाळी निघताना एक बायकर्स चा ग्रुप आमच्या पुढे जाताना दिसला . त्यात काही फिरंगीही  होते .  त्यांनी आम्हाला ' All  The  Best  ' अशा अर्थाचे थंब  दाखवले ... आम्हीही त्यांना तशाच प्रकारचा प्रतिसाद दिला . वळणा वळणांचा चढ  सुरु झाला . रस्ता मात्र चांगला होता पण,  रुंदीला कमी . वळणांमागून वळणं  घेत जात असतांना एक चार चाकी गाडी रस्त्यावर शिर्षासन करून उभी असलेली दिसली . बहुतेक वरच्या रस्त्यावरून ती थेट खाली आलेली असावी .  पुढे रस्त्यात एक मेंढ्यांचा  मोठ्ठा कळप लागला.



                  सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं ... सूर्य देव सहस्त्र  किरणांनी  आशिर्वाद  देत होता .   रस्ता मस्त होता ... काही अंतर गेल्यावर काही बायकर्स लोक रस्त्यात ऊन खात बसलेले आम्हाला दिसले . त्यांनीही आम्हाला all the best  चा थंब दाखवला ... एकूणच खडतर प्रवासातला एक अनामिक बंधुभाव सर्वजण एकमेकांना दाखवत होते .... जसजसा रस्ता चढत आम्ही वर जात होतो तसतसे हिमाच्छादित शिखरे नजरेस पडत होती ... काही शिखरांनी  बर्फाच्या पांढऱ्या गांधी टोप्या घातल्या होत्या ..., काही शिखरांनी  बर्फाची श्वेतवर्णी शाल पांघरली होती ... , तर काहींनी  गझनी पिक्चरच्या  आमिर खान सारखी काळ्या करड्या दगड मातीत बर्फाच्या पांढऱ्या  रेघोट्यांची  हेअर स्टाईल केल्यासारखी वाटत होती. आम्ही बरेच वरपर्यंत आलो होतो ... आता बोचरी  थंडी सुरु झाली . मध्ये एक लहानसा तलाव लागला आणि त्याबाजूला एक हॉटेलही होते.



             सकाळी काहीही न खाता निघालो होतो तेव्हा हॉटेल बघितलं  कि आपोआप गाड्या तिकडे वळल्या ... तिथलं  गरमागरम ऑंम्लेट आणि चहा हे पंचपक्वानांहून गोड लागत होतं ... (  पंचपक्वानांमध्ये  नक्की कोणत्या  डिशेस  मोडतात  ह्याचा उलघडा मला अजून पर्यंत झाला नाही. )  शेजारचा निळाशार तलाव सुंदरच होता . पाणी इतकं थंड कि 2-3 सेकंदाहून जास्त वेळ पाण्यात हात बुडवू शकत नाही ... पोटपूजा झाली आणि आम्ही परत गाड्यांवर टांग टाकली . रस्त्यावरून जात असतांना आजूबाजूला काही पांढरे खडक दिसले.  त्यावर धूळ साचलेली होती ... पण काही वेळाने लक्षात आले कि हे पांढरे खडक नसून बर्फाचे ढिगारे  आहेत  ... आणि ते  वितळून त्यातून पाणी ठिबकत होतं ... खरा खुरा रस्त्यावर पडलेला बर्फ मी प्रथमच पहात होतो... इतर वेळी मी तो फक्त गोलेवाल्याच्या गाडीवरच पहिला होता. आम्ही सगळी वळणे घेऊन अगदी वरपर्यंत पोहोचलो...
( रस्ता मोकळा करताना , B R O  चे जवान )


वर चढून गेल्यावर राणी नाल्यापाशी आम्हाला बऱ्याच  गाड्या रांगेने उभ्या असलेल्या दिसल्या... आमच्या match  च्या पहिल्या ओवर मधेच निसर्गाने गुगली टाकली ...पुढचा रस्ता दरड कोसळल्याने बंद होता आणि तो मोकळा करण्याचे काम सुरु होते ... वर चढत असतानाच संदीपला दम लागल्यासारखं वाटू लागलं ...पहिली विकेट ....!!  हाय अल्टीटुड  सिकनेस ने आपलं  काम सुरु केलं .... त्यावरची गोळी घेऊन तो थोडा वेळ पडून राहिला . इकडे रस्ता मोकळा करण्याचे काम जोरात सुरु होते . बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ( B R O ) चे जवान J C B  च्या सहाय्याने रस्ता मोकळा करत होते. त्यात 1 तास गेला. रस्ता मोकळा झाला आणि आम्ही राहतांगच्या दिशेने निघालो .
( बर्फाची भिंत ....)
 
  रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र भिंती ..., त्यातून झिरपून रस्यावर येणारं चमचमणारं  पाणी ...., वर निळेशार आकाश ....,  एखाद्या वेगळ्याच प्रदेशात आल्यासारखं  वाटत होतं ... स्वर्गात आणखी वेगळं  काय असेल ....?? शेवटी एका ठिकाणी गाड्या लावल्या आणि सरळ बर्फात शिरलो . आम्ही सगळेच वेडे झालो होतो ... कोणी जोरात ओरडत होते ... कुणी निसरड्या बर्फावरून घसरत  होते ... बर्फाचे गोळे करून एकमेकांना मारत होतो ... फुल टू  धमाल केली बर्फात .... 
( मी , पप्या  आणि  पियू बर्फात धमाल करताना ... )




     त्यानंतर पुढे निघालो ... मंगळवार असल्याने तो रस्ता डागडुजीसाठी काही वेळ बंद असतो . पुढे आणखी एक व्यत्यय आला ... रस्त्यावर पडलेली दरड बाजूला काढण्याचे काम चालू होते ... त्यामुळे रस्त्यावर चिखलच चिखल झाला होता ... त्यातून ती वजनदार  गाडी काढणे म्हणजे सर्कशीत दोरीवरून गाडी चालवण्या सारखं  आहे.... जरा टायर  घसरला कि गाडी स्लीप व्हायची ... खाली चिखलाचा राडा झालेला ....कसेतरी तिथून निघालो ...  रोहतांग उतरल्यावर  एका ठिकाणी चहा घेऊन पुढे निघालो .आता बऱ्यापैकी  सपाट प्रदेश सुरु झाला . त्यामुळे पप्याची गाडी मी घेतली . थोडं अंतर जातो न जातो तोच दुसरी विकेट पडली ... पप्या ..!!
 इतका खडतर रोहतांग पास त्याने पार केला , आणि आता साध्या  रस्त्यावर त्याला चक्कर यायला लागली ... हे म्हणजे अवघड अवघड गोलंदाजी खेळून काढावी  आणि साध्या  fulltoss बॉल वर क्लीनबोल्ड व्हावं असं  झालं ....एक वेळ तर अशी आली कि तो संदीपच्या गाडीवर मागे बसूही शकत नव्हता . आम्ही एका घराजवळ गाड्या थांबवल्या . खोप्या आणि संदीप मदतीसाठी त्या घरात विचारायला गेले . आमच्या सुदैवाने घरमालक चांगला निघाला ... त्याने आम्हाला त्याच्या घरातली एक खोली उघडून दिली ... आणि आराम करायला सांगितलं ... आमच्यासाठी  बिस्किटे आणि चहा बनवला ... त्याबद्दल त्याने आमच्याकडून काहीही घेतलं  नाही ... उलट आम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या ... ' जगात अजून चांगली माणसे  आहेत म्हणून हे जग चालू आहे ' याचा प्रत्यय आला ... आम्ही आज सारचू पर्यंत जाणार होतो परंतु आजच्या आलेल्या अडचणींमुळे आम्हाला केलाँग पर्यंतच जाता येणार होतं . रस्त्यात मध्ये एका पेट्रोल पंप  वर थांबलो ... हाच तो सुप्रसिध्द तांडी चा पेट्रोल पंप ज्यानंतर 365 किमी पुढे पेट्रोल पंप नाही ... " ह्याचसाठी केला होता अट्टहास ..." सारखं  , " ह्याचसाठी आणले होते पेट्रोल कॅन.... " असंच म्हणावं  लागेल .



  आम्ही गाडीच्या टाक्या फुल करून घेतल्या ... आणि आमच्या बरोबर आणलेले पेट्रोलचे कॅनही  भरून घेतले ... पुढे केलाँगला जाईपर्यंत आमच्या सगळ्यांच्या अंगातली शक्ती निघून गेली होती ... मलाही कणकणी  आल्यासारखी वाटत होती ...संध्याकाळी 6 च्या सुमारास आम्ही केलाँग ला पोहोचलो ... थोडंसं खाल्लं ... आणि  हॉटेल मध्ये जाऊन पडलो .... मेल्यासारखे ...!!!

रविवार, १५ जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण - 2


                    दिल्लीला ट्रेन मधून  बाहेर पडलो आणि आम्हाला कुणीतरी भट्टीत टाकलं  कि काय असं वाटलं....टळटळीत दुपार ...डोक्यावर आग ओकणारा सूर्य .... प्रत्येकाच्या अंगावर किमान 2 मोठमोठ्या bags .  इतकी उष्णता कि काही बोलू नका ....! तिथलं  उन हे झटका आणणारं होतं . ते कमी कि काय म्हणून दुसरं  एक संकट  आमच्या समोर दत्त  म्हणून उभं  ....! आमच्या तीन गाड्यांपैकी 2 गाड्या हजरत निझामुद्दीनला आणि 1 गाडी नवी दिल्लीला उतरवण्यात आली होती.... कल्याणहून गाड्या चढवताना 3 पैकी 2 गाड्या एका ट्रेन मध्ये  आणि संदीपची गाडी दुसऱ्या ट्रेन मध्ये  चढवल्याने हा घोळ झाला होता ....रेल्वे प्रशासनाची मेहेरबानी , दुसरं  काय ...!!  दिल्लीला पियूची ताई राहते. तिच्या मिस्टरांनी आधल्या दिवशी जाऊन गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. संदीपची गाडी शोधून तिचा पास बनवून त्यावर पार्सलबाबूची सही घेऊन ठेवली होती . त्यांच्या  मदतीमुळे  आमच्या गाड्या दिल्ली स्टेशनातून लवकर बाहेर काढता आल्या. त्यांनी आमच्यासाठी  बरीच धावपळ  केली. आणि त्यांच्यामुळेच ठरलेल्या प्लानप्रमाणे आम्हाला लवकर दिल्ली सोडता आली .... 

                   वेळ दुपारी 3 वाजताची .....तरीही  सूर्याची आग काही शांत झाली  नव्हती .... तशातच भर उन्हात आम्ही  गाड्यांवर समान बांधायला सुरुवात केली.... तिन्ही गाड्यांवर सामानाची बांधाबांध करण्यात अर्धा तास गेला ....अंगावर संरक्षक कवचे चढली .... गाड्या सामान  बांधून तयार झाल्या .... रायडर्स  बसले .... गाड्यांना चाव्या लागल्या ..... किक  मारल्या गेल्या ....ब्रू sssम  ब्रू sssम  एक्सलेटरचे  आवाज झाले .... आणि  आम्ही सज्ज झालो ते आमच्या  स्वप्नवत प्रवासाला .....
                                 
                    आजच्या रात्रीपर्यंत आम्हाला  चंदिगढ पर्यंत जायचेच होते ....दिल्लीत उष्णता इतकी होती कि रस्त्यावरचे डांबर गर्मीने वितळून मऊ  झाले होते. सिग्नल ला गाडी थांबली कि गाडीच्या टायरचे ठसे रस्त्यावर उमटत होते. एक वेळ अशी आली कि शरीरातली पाण्याची पातळी अतिशय खालावली. आमचा खजिनदार पप्याने जर वेळीच पाण्याच्या बाटल्या घेतल्या नसत्या तर आमच्यातले 1-2 जण  तरी उष्माघाताचे बळी ठरले असते. कॅमल bag  हे एक नवीन प्रकरण पप्याने आणलं  होतं ... त्यात पाणी भरून गाडी चालवता चालवताही पाईप द्वारे पाणी पिता येत असे. पप्याने  उगाचच शायनिंग मारायला हे आणलंय असं  आम्ही त्याला बोलूनही दाखवलं ..." बंर , मग पाण्यासाठी माझ्याकडे येऊ नका.... " पप्यानेही आम्हाला प्रत्युत्तर दिले ....  दिल्लीतून जसजसे बाहेर पडू लागलो तसे उनही कमी होत गेले . मग सुसाट वेगात आम्ही अंतर कापायला सुरुवात केली ... हमारी गाड़ियाँ हवां  से बातें  करने लगी ....  मध्ये येणाऱ्या गाड्यांना होर्न देत , ओवरटेक करत आम्ही पुढे  चाललो होतो . संध्याकाळी पानिपत च्या 20 किलोमीटर आधी एका ढाब्यावर आम्ही  नाश्ता करायला थांबलो ... मस्त  आलू पराठे हाणले ... चहा मारला ... आणि पुढच्या प्रवासाला निघालो ...अंधार होत आला होता ... अजून चंदिगढ 70-80  किमी लांब होतं . त्यामुळे मग अंबाल्याला राहायचं  असं  ठरलं. मस्त खाऊन  पियुन झाल्यानंतर झोपायला 12 वाजले. 
--" पहाटे 3 चा गजर लावा ,  लवकर उठायचं आहे ... " असं सांगून खोप्या गेला ...
   त्र्रीईई sssss गजर तर झाला..., पण सकाळी  6 वाजता ... सगळे धडपडत उठले .  आवरा आवरी करून निघेपर्यंत 7 वाजले. 

सकाळी रस्ता सुनसान होता . मग आमचे रायडर काय ऐकतात काय...!! भन्नाट वेगात मनालीच्या दिशेने निघालो. चंदिगढ चे रस्ते अगदी मस्क्यासारखे होते. प्रत्येक चौकात गोल गार्डन ... त्यावर सुंदर landscaping केलेलं.... रस्त्याच्या दुतर्फा स्वागत करण्यास सज्ज असलेली झाडे .... सकाळचं  कोवळं  उन .... कानाशी गुजगोष्टी करणारा वारा ....मस्त वाटत होतं .  सकाळी एका तासात आम्ही 70-80 किमी आलो असू....पोटातला कावळा  नावाचा पक्षी ओरडायला लागलेला .... एका पंजाबी धाब्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो... खोप्याने  ' पंज  परांठे और लस्सी दा ऑर्डर ' दिया. आम्ही दिल्लीत आल्यापासून खोप्याला काय झालं होतं  कुणास ठाऊक ? त्याच्या हिंदी मध्ये पंजाबी भाषेचा काही अंश उतरल्याचे जाणवत होते....त्याची पंजाबी भाषा भलतीच सोपी होती ....हिंदी भाषेतल्या क्रियापदाला " वांगा " प्रत्यय लावला  कि झाली  पंजाबी ....!!  त्यामुळे प्रत्येक क्रियापदाला तो  प्रत्यय लावून आम्ही त्याला चिडवू लागलो ... " मेनू खाणा  खावांगा ..., गड्डी  चलवांगा ..., पानी  पिलवांगा.... " असं काहीबाही बोलून त्याला काव आणला होता .... नाष्ट्यासोबत मस्करी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो.... 

                  पप्याची गाडी मी चालवायला घेतली....बिलासपुर कडे जाणाऱ्या घाटाला सुरुवात झाली .... सळसळत्या नागिणी सारखा समोरचा रस्ता .... वातावरणातली  आल्हाददायक थंडी.... मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी .... रस्त्यांवरून गाडी चालवायला भलतीच मजा येत होती. पण थोड्या वेळाने परत पप्याकडे गाडी देऊन मी संदीपच्या गाडीवर मागे बसलो . मनालीच्या वाटेवर एके ठिकाणी चांगलाच पाउस  सुरु झाला...  बिलासपुर . सुंदरनगर ,  मंडी  , मागे टाकत आम्ही  पुढे चाललो होतो .  रस्त्याला समांतर रेषेत बियास नदी आमची साथ देत होती... अंधार पडायला आला त्यावेळी आम्ही मनालीच्या जवळ पोहोचलो.... आणि तिथे आम्हाला दिसले ते पहिले हिमाच्छादित पर्वत.... 

ते दिसल्यावर तर आमच्या  फक्त उड्या  मारायच्या बाकी राहिल्या होत्या .... हिमालयाचं  ते प्रथम दर्शन अतिशय मनोहारी होतं ... मावळतीचे किरण हिमालयाच्या शिखरांवर पडून उजळून निघाले होते .... मनालीत पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार झाला ... मग निवाऱ्यासाठी आम्ही हॉटेल दर हॉटेल फिरलो .... शेवटी कसेतरी एका हॉटेल मध्ये थकलो - भागलेलो   आम्ही बेड वर जाऊन पडलो , पुन्हा एकदा पहाटे 3 चा गजर लावून .... कानात एन्फिल्डच्या  सायलेन्सरचा आवाज अजूनही घुमत होता ....

मंगळवार, १० जुलै, २०१२

दुचाकी लडाखायण

                तब्बल एका वर्षापासून  ठरत असलेला  आमचा लडाखचा  बेत  सत्यात उतरत होता ... दुपारच्या ट्रेनने आम्ही दिल्लीला रवाना होणार होतो .  सुरुवातीला  लडाखला जायला उत्सुक असणाऱ्या 9 जणांपैकी आम्ही फक्त 5 जण ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस मध्ये चढलो होतो.   पाच जण  म्हणजे -- संदीप , खोप्या , पियू  ( खोप्याची बायको ), पप्या   आणि मी....  ट्रेन च्या 3 tier AC  ची थंडगार हवा पुढे येणाऱ्या थंडीच्या लाटेची झलक दाखवत होती . गाडीचा भोंगा वाजला .हलकासा झटका देऊन संथगतीने गाडी सुरु झाली.... कदाचित पुढच्या प्रवासात बरेच मोठे झटके येणार असंच काहीसं ती सुचवीत असावी . गाडीने वेग घेतला , आणि सुरु झाला तो स्वप्नांच्या प्रदेशातला प्रवास .....  सामान- सुमान नीट लावून झाल्यानंतर निवांत बसलो , आणि मला मागच्या 3-4 महिन्यांच्या घटना आठवायला लागल्या....




-- " लडाखला ....??? आणि  बाईक वर ....??? " घरच्यांचा असा प्रश्न आला कि मी कुठेतरी चंद्रावरच चाललोय ... पण लडाखला जाण्यासाठी चंद्रावर  जाण्याइतकीच पूर्वतयारी करावी लागते , याचा प्रत्यय आम्हाला नंतर आलाच...! आता जर बाईक वर जायचं  म्हणजे गाड्याही तशाच दणकट हव्यात . त्याबाबतीत रॉयल एन्फिल्ड  ला तोड नाही ....खोप्या आणि  संदीप ने नव्या कोऱ्या एन्फिल्ड लडाखला जाण्यासाठी विकत घेतल्या. त्यांच्या त्या अजस्त्र गाड्यांसमोर माझी होंडा शाईन म्हणजे हिंदकेसरी समोर काडीपैलवान ...!!! तरीही ती लडाखचे रस्ते चढू शकेल असं  काही जणांचं म्हणणं .... , तर काही जण ,  ' ती दिल्ली ते मनाली  गेली तरी नशीब... ' असं  म्हणू लागले ...
-- " काही नाही रे , एक जण  तर बजाज चेतक घेऊन लडाखला गेला होता " असं  म्हणून खोप्या अधून मधून मला धीर देत होता. खरं सांगायच तर मला माझी बाईक घेऊनच लडाखला जायचं  होतं  पण , ऐनवेळी आमच्यातल्या 4 जणांनी  यशस्वी माघार घेतल्याने ' फुकट पेट्रोलचा खर्च कशाला ? 'म्हणून मग 3 बाईक घेतल्या . तिसरी गाडी म्हणजे पप्याची यामाहा FZ ... पाच जणांमध्ये तीन गाड्या हे योग्य समीकरण होत . आता 15 दिवसांचा प्रवास म्हणजे भरपूर सामान  आलंच .... अन ते बाईक वरून न्यायचं म्हणजे त्यासाठी विशिष्ठ कॅरियर्स लागणार होती. ती लडाख  कॅरियर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. खोप्या आणि संदीप ने ती कुठूनतरी मागवली आणि गाड्यांना बसवून घेतली ....त्यात 2 बाजूंना 2 मोठ्या  bags  मागे 1 लहान bag  आणि मुख्य म्हणजे पेट्रोलचे 2 कॅन  ठेवण्यासाठी जागा होती... अशी ती बहुपयोगी कॅरियर्स गाडीला लावून फिरले कि लोक माना वळवून वळवून पहायचे... एक- दोन जणांनी तर ''लडाख  का ..??" असेही विचारले . लोकांनी गाड्यांकडे कुतूहलाने बघितलं किंवा विचारपूस केली कि खोप्याला जीवनाचं  सार्थक झाल्यासारखंच  वाटायचं.... तिन्ही गाड्यांची सर्विसिंग करून घेतली होती ... आणि गाड्या आम्ही निघायच्या 2-3 दिवस आधीच  ट्रेनने दिल्लीला पाठवल्या होत्या .
               गाड्यांची अशी सजावट झाल्यानंतर वैयक्तिक खरेदीला सुरुवात केली... मुख्य म्हणजे तिथल्या थंडीसाठी थर्मलस , jackets , झीपर्स ,  हातमोजे , दरोडेखोर चेहरा दिसू नये म्हणून डोक्यावर  घालतात तसला   बालाक्लेवा   , नवीन स्पोर्ट्स शूज ,  नि- गार्ड , एल्बो गार्ड , हेल्मेट ह्यांची खरेदी झाली.... हे सगळं एकदम  अंगावर चढवल्यावर मी कोणीतरी महाभारतातलं पात्र  किंवा   अंतराळवीर वाटतोय असं  घरच्यांचं मत पडलं ....
तिथे लागणारी सगळ्या प्रकारची औषधे , गोळ्या,  मलमे  हि  खोप्या आणि पियूने आधीच खरेदी करून ठेवली  होती  . त्यात एक ' हाय अल्टीट्युड सिकनेस ' साठीची गोळी होती... ह्या अशा प्रकारचा सिकनेसही  असू शकतो आणि त्यावर गोळ्या असतात हे ऐकून तर मला मोठी गम्मतच  वाटली....हाय अल्टीट्युड सिकनेसचा  असा काय मोठा त्रास होणार होता....??  पण त्यावेळी मला कुठे माहित होतं  कि , त्या गोळ्यांची  जास्त गरज मलाच लागणार होती ....
              लडाखला जायचा रस्ता , कोणत्या दिवशी कुठपर्यंत जायचं.... , कुठे राहायचं ...., याचा सगळा प्लाsss न खोप्याने तयार केला होता ...आणि तो आम्हाला वेळोवेळी ते  इ-मेल हि करायचा , पण आम्हाला आमच्या दिनचर्येतून ते पाहायला वेळच नव्हता ... प्रवासाची तारीख जवळ येत असताना काही जाणकारांकडून आम्हाला असं कळलं  कि आम्ही उलट्या दिशेने लेह ला जाणार होतो ....बाईक वरून जाणारे जम्मू मार्गे लेह ला जातात आणि मनालीला उतरतात  , पण आम्ही दिल्ली -  मनाली  वरून लेह ला चढणार होतो. 
 -- " अरे 21 गाटा  लुपस चढण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या  कशात नाही ..." असं  खोप्या म्हणाल्यामुळे आम्हालाही स्फुरण चढलं  होतं ...... इतकी सगळी तयारी , प्लान झाल्यानंतर सामानाच्या ब्यागांचा डोंगर सांभाळत  आम्ही राजधानी एक्स्पेस मध्ये चढलो होतो ....
              राजधानी एक्स्पेस मधली सरबराई काय वर्णावी....?? आल्या आल्या अर्ध्या तासातच आम्हाला snacks आले , मग चहा , मग 2 तासांनी टोमाटो  सूप , मग 1 तासाने जेवण , मग आईस्क्रीम ....आगगाडीच्या डब्यांसारखी लाईनच.... रात्री मस्त ताणून दिली , सकाळी उठलो तेव्हा मथुरा स्टेशन वर गाडी उभी होती .... आता आणखी  2-3 तासात दिल्ली ....! तिथे  आमच्या गाड्या आमची वाट पाहत होत्या ....  




माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7