बुधवार, १ मे, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १४ … ( अंतिम भाग )

श्रीनगर मधल्या हॉटेलच्या बाहेर सकाळी पाहीलं तर दोन हत्यारबंद सैनिक पहारा देत उभे होते. श्रीनगर मधे गोंधळ चालु होता.  कर्फ्यु लावण्यात आला असल्याने वातावरण तंग होते.   काश्मिरसारख्या स्वर्गात हे सैनिक बिचारे नरकयातना भोगत असलेले बघुन मला खरंच वाईट वाटलं... आम्ही लवकर आवराआवरी केली.  आज आमचा दुचाकीवरचा शेवटचा दिवस होता. जम्मु मधे पोचल्यानंतर आमच्या गाड्या रेल्वेच्या बोगीने स्वतंञपणे येणार होत्या. आमची परतीची रेल्वेची तिकीटे अजुन कन्फर्म झाली नव्हती... ते एक टेन्शन होतंच... रस्ता चांगला असल्याने गाड्या सणाणत निघाल्या... लडाखचा रस्ता एकलकोंडा होता , पण आता इथल्या रस्त्याला सर्वञ रस्त्याच्या दुतर्फा दुकाने,  रहदारी होती... सकाळी नाष्ट्यासाठी एका पंजाबी हॉटेल मधे थांबलो. पंजाबी हॉटेल म्हटलं की पराठे आलेच...खाऊन निघालो. अमरनाथ  याञेमुळे  रस्त्यावर सर्वञ  गाड्याच गाड्या. त्यातुन वाट काढत आम्ही निघालो... आता ऊन 'मी' म्हणत होतं. श्रीनगर हुन  काश्मिर खोऱ्यात जाण्यासाठी एक बोगदा लागतो,  जवाहर टनेल ... तो भलामोठा बोगदा पार केल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी लाईट गेल्यावर होते तशी परीस्थीती झाली. वातावरण एकदम बदललं, अगदी जाणवे इतपत ...! थंडगार वातावरण एकदम उष्ण वाटु लागलं...  
हायवे वर बरेच मजेमजेदार स्लोगन लिहीलेले होते... " पीप पीप , डोंट स्लीप... " , " अगर रफ्तार का इतनाही शौक है तो पी टी उषा बन जाओ..." तसेच " प्लीज , बी सॉफ्ट ऑन माय कर्वस्..." अशासारख्या द्वयार्थी पाट्याही लावलेल्या दिसत होत्या . आत्ताचा रस्ता म्हणजे संपुर्ण घाट आणि तोही भरपुर ट्रॅफिक असलेला ...समोरच्या गाडीला बराच वेळ ओव्हरटेकही करता येत नव्हतं... जीव मेटाकुटीला येणे म्हणजे काय ते त्यावेळी आम्हाला कळाले... जम्मु ला आज पोहोचणं अतिशय गरजेचं होतं. कारण आम्हाला परतीची पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती... संध्याकाळच्या सुमारास आम्ही जम्मु पासुन ५० - ६० किमी असु तेव्हा गच्च आभाळ भरुन आलं. जसजसे पुढे जाऊ तसतसे ते आमच्या मागेच येऊ लागले. पाउस पुन्हा आपली गोची करणार असे वाटून आम्ही गाड्या सुसाट सोडल्या . पण शेवटी चपळ शिकारामागे धावुनही ती हातात येत नाही असे समजल्यामुळे पावसाने माघार घेतली… आता जम्मु काही लांब नव्हतं. त्यामुळे आपण सुखरुप पोहोचु अशी मनात खाञी वाटु लागली... पण खाञी देता येईल अशी कोणतीही गोष्ट ह्या सबंध प्रवासात घडलेली नव्हती तर ती आता तरी कशी घडेल… ?  पाहतो तो समोर गाड्यांच्या रांगा दिसल्या ... सुरुवातीला वाटलं काही  काम चालु असेल... पण हळुहळु जागा मिळेल तसे पुढे गेलो तर गाड्याच गाड्या उभ्या होत्या ... हे काही निराळच प्रकरण आहे हे आमच्या लक्षात आलं … जवळपास ८-९ किलोमीटर अंतरावर ट्रॅफिकमुळे गाड्या अडकल्या होत्या ... त्यातुन आमच्या गाड्या काढणं म्हणजे चक्रव्युह भेदण्यासारखं होतं ... कधी दोन गाड्यांच्या चिंचोळ्या जागेतुन तर कधी रस्ता सोडुन आडमार्गाने  आमचे अभिमन्यू जिथुन मिळेल तिथुन गाड्या घालत होते... आता शेवटची हातघाईची लढाई सुरु झाली... लक्ष - कोणत्याही परिस्थीतीत लवकरात लवकर जम्मु गाठणे... शर्यतीचा शेवटचा टप्पा असतो तसा... पप्या, संदीप आणि खोप्या यांच्या ड्रायविंगला मानलं आपण...! त्यांनी चपळाई करुन गाड्या काढल्या नसत्या तर आम्ही सकाळपर्यंत तिथेच अडकलो असतो. रात्री ९च्या सुमारास कसेबसे आम्ही जम्मु मधे पोहोचलो.. आता सर्वात कंटाळवाणं काम म्हणजे हॉटेल शोधणे... पण आमच्या नशिबाने एक चांगलं हॉटेल मिळालं - हॉटेल विवेक.  त्याचा मालकही चांगला होता. आमच्या परतीच्या तिकीटांचा प्रश्न त्याला सांगितल्यावर त्याने लगेच दोन- चार फोन फिरवले... परंतु त्याचा फारसा काही फायदा झाला नाही. सकाळी तत्काळ तिकीटांसाठी जम्मु स्टेशन वर जाण्याचा सल्लाही त्याने दिला. आम्ही सर्व जण एका मोठ्या प्रशस्त रुम मधे राहीलो...हॉटेल छान होतं आणि जेवणही … दुसऱ्या दिवशी पहाटे खोप्या आणि संदीप तत्काळची तिकीटे मिळवण्यासाठी तिकीट खिडकीपाशी नंबर लावायला गेले... थोड्या वेळाने मी आणि पप्या  गेलो तर तिथे भलीमोठी रांग लागलेली दिसली...रांग काही पाठ सोडत नव्हती...  आमचा नंबर बराच मागे होता... बऱ्याच वेळाने जेव्हा गेट उघडलं तेव्हा शाळा सुटल्यावर मुलं जशी पळतात तशी सगळी माणसं तिकीट खिडकी कडे पळत सुटली ... एकच झुंबड उडाली... त्या गोंधळात  खोप्याने चपळाई करुन  पुढचा नंबर पटकावला ... आता आम्ही तिकीट खिडकीच्या बरेच जवळ आलो होतो. मग रांगेतल्या माणसांची जागेवरुन भांडणं, आरडाओरडा,  गोंधळ सुरु झाला. खिडकी उघडली ... तत्काळची तिकीटे इतक्या तत्काळ संपतील ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती... भल्या पहाटे तिकीटे काढण्याचा प्रयत्न असफल ठरला... आमच्यापुढे आता फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहीलं ... घरी जायचं कसं?  कारण एवढ्या लांबचा प्रवास, भरपुर सामानासकट , बिना रिझर्वेशन कसं जाणार...? डोक्याला हात लावुन बसायची पाळी आली... कुणीतरी म्हणाले " प्लेन ने जाऊ... " आधी तो विचार म्हणजे अतिशयोक्ती वाटली पण नंतर  त्यातले फायदे लक्षात आले... आम्ही चारपाच तासात घरी जाणार होतो... शिवाय एक दिवस आधी... ऑफिसला जाण्याआधी एक दिवस आराम... पप्या, पियु आणि खोप्या यांनी विमानप्रवास आधी केला होता... पण माझा आणि संदीपचा हा पहिलाच विमान प्रवास … ! त्यामुळे आमच्याकडुन तर होकार होताच... प्लेनच्या तिकीटाचे जास्तीचे ५ -६ हजार माञ जाणार होते .. परंतु एवढ्या सगळ्या फायद्यासमोर हा  तोटा सोसण्याजोगा होता. शेवटी सर्वानुमते ठरवलं... खोप्या आणि संदिप त्या कामाला लागले... माझा तर पहीलाच विमान प्रवास , त्यामुळे मला आधीच आकाश ठेंगणं झालं होतं... आता आणखी महत्वाचं काम म्हणजे गाड्या पार्सल करणे... जम्मु स्टेशनवर एका एजंटला गाठला ... पण तिथे गाडीतल्या पेट्रोलवरुन खोप्या आणि तिथल्या एका पोलीस हवालदाराचं वाजलं... तो हवालदार गाडीतुन काढलेलं पेट्रोल परस्पर घेऊन आपल्या गाडीत टाकण्यासाठी नेत होता... आता काय बोलायचं त्या हवालदाराला …! खोप्या ते द्यायला तयार नव्हता. हवालदार अरेरावी करु लागला... त्याने एजंटला धमकावलं कि गाड्या रेल्वे च्या हद्दीत pack करायच्या नाहीत … खोप्याही भडकला होता... ह्या दोघांच्या भांडणामुळे गाड्या इथेच अडकुन पडतील की काय असं वाटु लागलं तेव्हा मी खोप्याला समजावलं आणि तिथुन रुमवर  घेऊन गेलो. इकडे पप्या आणि संदीप ने मोठ्या मुश्कीलीने गाड्या पाठवण्याचा बंदोबस्त केला... मुंबईला येणाऱ्या गाडीचा लगेजचा डबा हा पुढच्या संपुर्ण महीन्यासाठी बुक होता... मग पुण्याला जाणाऱ्या गाडीच्या लगेज बोगीतुन गाड्या पाठवल्या... असे एक ना अनेक अडचणींना तोंड देत आमची शेवटी जाण्याची तयारी झाली... आम्ही आता लवकरच उडणार होतो. 
दुसऱ्या दिवशी सर्व सामान सुमान घेऊन जेव्हा जम्मु एअरपोर्ट वर गेलो तेव्हा तर माझी घोर निराशा झाली . आपल्याकडचा एस टी स्टॅंड बरा... ! एअरपोर्ट भलतंच लहान होतं .  पण काही का असेना आपण आकाशात उडणार ह्या कल्पनेनेच मला स्वर्ग दोनच बोटे उरला होता. शेवटी एकदाचे आम्ही सर्वजण विमानात स्थानापन्न झालो... माझी विमानप्रवासाची पहीलीच वेळ असल्याने खोप्या आणि पियु ने उदार अंतःकरणाने मला खिडकीजवळची सीट दिली... लहान मुलाला आकाशपाळण्यात बसल्यावर कसे वाटेल तसे मला विमानात बसल्यावर वाटत होते. काही वेळाने विमानात सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पहात असतात त्या हवाईसुंदरी आल्या... आपल्या स्मितहास्याने आणि लाघवी बोलण्याने, त्या विमानातल्या प्रवाशांना बसल्या बसल्याच  वर घेऊन जात होत्या. त्यातल्या एकीने लहान मुलं बडबडगीतांच्या चालीवर  हावभाव करुन दाखवतात तसे हातवारे करुन सुचना द्यायला सुरुवात केली ... ते फारच गमतीदार वाटत होतं... मला तर चुकुन जोरात हसायला येईल की काय अशी भिती वाटु लागली.…  थोड्या वेळाने विमानाच्या इंजिनाचा आवाज यायला लागला... आणि भुकंप झाल्यासारखे हादरे बसायला लागले.  बाहेर पाहीलं तर विमान सुरु झालं होतं.. हळू हळू वेग वाढु लागला … ते विमान इतकं हादरत होतं की मला एसटीत बसल्यासारखं वाटू लागलं , आणि एका क्षणी झोकांड्या देत गपकन ते महाकाय धूड आकाशात झेपावलं . पोटात लहानसा गोळा आला … मी आता खऱ्या अर्थाने ' हवेत ' होतो… हवेत थडथडणारं विमान काही वेळाने उंचीवर गेल्यावर मात्र स्थिर होऊन उडू लागलं … एक मन म्हणत होतं , एवढ्या उंचीवरून हे विमान खाली पडलं तर …? त्याचवेळी दुसरं मन त्या उंचीची मजा लुटत होतं … हवाई सुंदऱ्या आमची सरबराई करत होत्या … कधी चहा - कॉफी आणून दे तर कधी काही खायला आणून दे … त्या सगळं हसत मुखाने करत होत्या … रात्री ८ -९ च्या सुमारास विमान मुंबई जवळ आलं … वरून जे दृश्य दिसलं ते केवळ अवर्णनीय …! लक्ष दिवे , त्यात मुंबई उजळून गेलेली … झगमगती मुंबई … डोळ्यांचं पारणं फिटणे म्हणजे काय ते त्यावेळी मला कळाले … वर आकाशात स्थिर असलेलं विमान आता वेगाने मुंबईकडे झेपावू लागलं … हलकासा धक्का देऊन विमान मुंबईच्या भूमीवर उतरले … जाताना हवाईसुंदऱ्या स्मितहास्य करून निरोप देत होत्या … त्या गोड निरोपाबरोबर आमचे लडाखायणही संपले होते … हे कळले , जेव्हा शरीर आणि मन दोन्ही जमिनीवर आले तेव्हा … !!!




मागे वळुन पाहताना ...
' केवळ पाच जण, सर्व नवखे,  तीन दुचाकी,  विशेष असा कोणताही बॅकअप नसताना,  कोणताही अनुभव नसताना ... जवळपास २००० किलोमीटरच्या वर अंतर , जगातल्या अत्यंत खडतर प्रदेशात,  जिथे काही ठिकाणी माणसं क्वचितच पहायला मिळतात अशा निर्मनुष्य प्रदेशात, अनेक संकटांना तोंड देत आपली सफर पुर्ण करतात आणि तितकीच धमालही … ! ' , स्वप्नवत आहे सगळं ….
मी जेव्हा जेव्हा लडाख बद्दल विचार करतो तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटतं .... तब्बल वर्षभर आधी हा प्लॅन बनत होता … कसं जायचं..? कुठे रहायचं....? याबाबत चर्चासत्रे होत होती, वाद-विवाद होत होते … पण  मी त्यात तितकासा भाग घेतला नाही ,  कारण  इतके दिवस सुट्टी मिळेल याची माझी मलाच शाश्वती नव्हती... जे अगदी ठामपणे जायचं म्हणत होते त्यातले  काही जण ऐन वेळी रद्द झाले... आणि मी काहीही विशेष तयारी नसताना लडाखला जायला निघालोही... कदाचीत ही लडाख टुर माझ्या ऩशीबात होती…! 
लडाख … केवळ शब्दावरूनच काहीतरी भयानक ठिकाण असेल याचा अंदाज येतो … परंतु जितका तो प्रदेश भयानक आहे त्यापेक्षा त्याचे सौंदर्य अधिक … ! भयानक सौंदर्य …! इथला निसर्ग जरी काही वेळा क्रूरपणे वागला असला तरी त्याने आमची अडवणूक कधीही केली नाही … त्याने बिनधास्त पणे आम्हाला त्याच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे फिरू दिले … आमच्यासमोर संकटेही अशी ठेवली कि ज्यांचा आम्ही सामना करू शकु… न पेलणारी संकटे त्याने आमच्यापासून दूर ठेवली किंवा आम्हाला त्यांच्यापासून लांब राहण्यात अप्रत्यक्षरित्या मदत केली , आता हे आमचं नशीब असेल किंवा निसर्गाने आमच्यावर दाखवलेली मेहेरबानी … काहीही असो … आम्ही सुखरूप पणे घरी परतलो … 
जम्मूवरून विमान आकाशात उडाले तेव्हा मागच्या १०-१५ दिवसांचा काळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरुन येऊन गेला.  लडाखायणासाठीची आमची तयारी, राजधानीचा प्रवास, दिल्लीतली अंग भाजुन काढणारी उष्णता..., मनालीतलं हिमाच्छादीत शिखरांचं फर्स्ट साईट लव… , रोहतांग मधला हिमरोमॅन्स… , आपल्याच धुंदीत असणारा मनमौजी रस्ता… ,  मधुनच त्याला  प्रेयसीप्रमाणे भेटणारी, नुकतीच वयात आल्यासारखी वाहणारी अल्लड नदी, पर्वतरुपी बापाचा डोळा चुकवुन आल्यासारखी वाटायची... , वाटेत व्हीलनप्रमाणे भेटलेले टेरर टांगलांग ला, खतरनाक खारदुंग ला, फाडु फुटु ला, झंजावाती झोजी ला  ह्यांची भिती कायम राहील ... पण चांग - ला चा चांगुलपणाही आठवणीत राहील... , बियास , झेलम , सतलज ह्यांच्या सोबतीने केलेला प्रवास स्मरणातून जाणार नाही … , लेह आणि त्याला स्पर्शुन जाणारी सिंधु नदी मनाच्या एका कोपऱ्यात सुरक्षीत आहेत... , शांतीस्तुपाने मनातला कलह शांत झाला... , पॅंगॉंग लेक मधल्या नितळाईची नुसती एक झलक पुढच्या संपुर्ण आयुष्यासाठी पुरेशी आहे... , टायगर हिल,  टोलोलिंग ची टेकडी, विजयस्मारक तर ह्रृदयावर असं कोरलंय की त्याचे विस्मरण केवळ मृत्यु नंतरच होईल... , चित्रपटाच्या climax प्रमाणे अनपेक्षित घडलेल्या विमानप्रवासाने शेवट गोड झाला … , आणखी काय सांगु ... ? हे सर्व लिहिताना संपूर्ण प्रवास पुन्हा डोळ्यांसमोरून तरळून जातोय … दुचाकी लडाखायण करून आम्ही परत सुखरूप घरी आलो खरे , पण आमची मने मात्र अजूनही तिथेच आहेत ………



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १३…

 
झोजी ला .... लडाख प्रदेश आणि काश्मिर प्रदेश  यांना जोडणारा घाट... त्याबद्दल असं ऐकलं होतं की तो पास  अतिशय अरुंद ,  खतरनाक आहे आणि दिवसाचे काही तास कामकाजामुळे बंद असतो...  विजय स्मारकावरुन निघुन आज आम्हाला राञीपर्यंत श्रीनगर गाठायचं होतं. पण मधे वाटेत झोजी -ला शी सामना करायचा होता... झोजी ला पास कडे जात होतो समोर पाहतो तो सबंध आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आलेलं दिसलं... जोरदार पाऊस पुढे पडताना दिसत होता...काश्मिर खोऱ्यातला सगळा पाऊस एकवटुन इथंच पडतोय की काय असं वाटण्याजोगा धुंवाधार पाऊस समोर पडताना दिसत होता.  मला पुन्हा त्या फुटुला  पासमधल्या हाडं गोठवणाऱ्या पावसाळी थंडीची आठवण झाली आणि अंगावर  काटा उभा राहीला.... समोरच्या पर्वतावर  बरसणारा तो पाऊस बघुन आम्ही थोडं थांबलो. निसर्गाच्या सामर्थ्यापुढे आमचं काय चालणार होतं...?  रेनकोट अंगावर चढवले. हळुहळु पुढे निघालो. पण पुन्हा आमचा पोपट झाला... जसा घाट चढायला लागलो तसा पाऊस गायब झाला आणि लख्ख ऊन पडलं... झोजीला मधे एक विशेष होतं की तिथे डोंगरांच्या कुशीत सर्वञ लांबच लांब हिरवीगार कुरणे दिसत होती....गालिचा अंथरल्यासारखी...अगदी बालकवींच्या कवितेसारखी.... 




बरेच मेंढपाळ आपल्या काश्मिरी शेळ्या मेंढ्यासोबत आनंदाने बागडत होते... क्षणातले रौद्र वातावरण  दुसऱ्या क्षणी आल्हाददायक बनले होते... काय म्हणावं आता इथल्या निसर्गाला...!  कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत आम्ही निघालो. काही ठिकाणी बर्फाच्या ताशिव भिंती रस्त्याच्या दुतर्फा प्रेक्षकांसारख्या उभ्या होत्या ... आम्ही थोडं अंतर पुढे जातो न जातो तोच....काय झालं असेल ?  ...सांगायलाच नको...  पुन्हा गाड्यांची रांग...काम चालु  रस्ता बंद...!  


                                    

आम्ही जवळपास दुपारी १ च्या सुमारास तिथे पोहोचलो असु. आता ३ वाजता हा मार्ग मोकळा करण्यात येईल असे तिथले पहाऱ्यावर असलेले सैनिक म्हणाले... तब्बल दोन तास वाट पहावी लागणार होती... आमच्या बरोबर तसे बरेच लोक अडकले होते. दोन तास ह्या वैराण घाटात बसुन काय करणार...?  आजुबाजुला फिरायला जागाही नव्हती... मुळातच झोजी ला  मधुन एकच गाडी जाऊ शकेल इतका अरुंद रस्ता होता, एका बाजुला उंच कडा आणि दुसऱ्या बाजुला खोल दरी... मागे गाड्यांच्या रांगा... काय फिरणार...? आम्ही थोडा वेळ तसेच बसलो. काही लोक त्यांच्या गाड्यांबाहेर  आले आणि दोन तीन तासांची निश्चिंती असल्यामुळे पथारी टाकुन मस्तपैकी आडवे झाले... सुखी प्राणी... काही जणांनी तीन दगडांची चुल मांडुन त्यावर चहा कराय़ला सुरुवात केली... कोणतीही परिस्थीती येवो माणुस आपला गुणधर्म काही सोडत नाही. आपण काय टाईमपास करावा ह्या विवंचनेत असताना पप्याने त्याच्या बॅगेतुन पत्ते काढले.... आणि आमची सुटका केली... तीनपत्ती खेळण्याचा ठराव पास झाला...आणि पैसे म्हणुन प्रत्येकाने २०-२० खडे वापरायचे ठरले... काय गमतीदार परीस्थीती पहा... आम्ही घरापासुन सुमारे 3000 किमी लांब झोजीला मधे बसुन पत्ते खेळणार आहोत हे कुणाच्या स्वप्नातही आलं नसतं... पण ते घडत होतं. पियु ला तीनपत्तीचे रुल्स माहीत नव्हते पण पोरीचं ऩशीब जोरावर होतं... जवळपास सगळे गेम तिने आणि खोप्याने जिंकले...माझ्याजवळचे खडे संपायला आले की मी हळुच आजुबाजुचे खडे गोळा करुन ते कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीने वापरत होतो... तीनपत्तीच्या खेळात कसली इमानदारी दाखवायची...?  ते पप्याच्या लक्षात येणार तेवढ्यात आम्ही बसलो होतो त्या बाजुच्या कड्यावरुन काही खडे खाली पडले... आधी वाटलं की कोणीतरी मस्करी करतंय पण थोड्या वेळाने जास्तच खडे पडु लागले... वरचा कडा अंगावर ढासळणार या भितीने आम्ही जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला आणि पळत सुटलो... आमची धावाधाव बघुन आजुबाजुचे लोकही घाबरले आणि पळु लागले...जे झोपले होते ते तडफडुन जागे झाले...गाडीत होते ते गाडीतुन बाहेर पडुन सैरावैरा पळु लागले.  हा प्रांत म्हणजे वेड्याचा झटका आलेल्या माणसासारखा आहे... कधी काय होईल ते सांगता येत नाही... ह्या पळापळीत आमचे काही पत्ते  उडुन समोरच्या दरीत पडले...चोरटा जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची धाड पडल्यावर जशी होईल तशी धावपळ झाली... पण आमची भिती  निरर्थक होती... काहीच झालं नाही... पण त्या कड्याखाली बसायचं धाडस नंतर कुणाला होईना... बराच वेळ रस्ता बंदच होता... भुकही लागली होती ...हा रस्ता कधी मोकळा होईल असं झालं... शेवटी आमची प्रतिक्षा संपली... आम्ही गाड्या काढल्या खऱ्या पण पुढचा रस्ता बघुन तो बंद होता तेच चांगलं होतं असं वाटायला लागलं...सगळा रस्ता मातीचा... आणि नुसता मातीचा नाही तर मोठमोठे खड्डे असलेला ... ओबडधोबड... बाजुला आमच्याकडे अधाशीपणे पाहाणारी  खोल दरी तिच्याकडे आकर्षित करीत आहे असं वाटत होतं.. फार जपुन गाडी चालवावी लागत होती... आम्ही घाटात समोर लांबवर पाहीलं... समोरुन येणाऱ्या गाड्यांची भलीमोठी रांग दिसली... जसे आम्ही ह्या बाजुला थांबलो होतो तसे त्या गाड्या पलीकडे थांबल्या होत्या ... झोजीला मधे काही ठिकाणी समांतर रस्ते होते ... त्यापैकी एका ठिकाणी रस्ता चुकलो,  वरुन काम चालु असल्याने काही ठिकाणी दगडांचा वर्षाव,  चिखलाचा राडा, गाडी घसरणे असल्या प्रकारांना तोंड देत आम्ही कसेबसे झोजी ला उतरलो... खाली येऊन पहातो तो मुंग्यांचं वारुळ फुटावं तशी सर्वञ माणसं आणि गाड्या... मुंबईमधे लोकल्स लेट झाल्यावर होते तशी तोबा गर्दी.… ! हे सर्वजण अमरनाथ याञेसाठी आलेले होते...त्यांच्यातुन वाट काढत आमचे रायडर्स सुसाट निघाले... खाली आम्हाला सोनमर्ग हे ठिकाण लागलं. तिथे आलो त्यावेळी पोटात काकयुद्ध सुरु झालं होतं... मग एका हॉटेलात मस्तपैकी मॅगी हाणली... आणि जरा आराम केला...मी सहज मागे पाहीलं., मागचा झोजीला चा डोंगर मावळतीच्या प्रकाशात सोन्यासारखा  उजळुन निघाला होता... आपले सोनमर्ग हे नाव सार्थ करत होता... 



खाणंपिणं झालं....गाड्यांवर टांगा टाकल्या ...आणि श्रीनगर च्या दिशेने निघालो... ते अंतर जवळपास ७० -८० किमी होतं ...पुढचा रस्ता तसा चांगला दिसत होता... आणखी दोन तासाचा प्रवास ... आम्ही सुसाट गाड्या सोडल्या. रस्त्याने जाताना मधेच एक चारचाकी गाडी आमच्या बाजुने पुढे जात असताना  " नमस्कार  ओ कल्याणकर ... " अशी हाक ऐकु आली. गाडीचा नंबर MH 05 असल्याने आम्ही कल्याण च्या जवळपासचे असु असा अंदाज  करुन गाडीतला तो  माणुस आम्हाला all the best...देत होता... आम्हीही त्याला प्रतिसाद दिला.  खरं तर आमची आणि त्याची ओळख असण्याची कोणतीच शक्यता नव्हती. तरीही त्याने आम्हाला हाक मारली... हाच माणुस जर महाराष्ट्रात कुठे भेटला असता तर त्याने आमच्याकडे बघितलंही नसतं...अनोळखी प्रदेशात आपल्याकडचा अनोळखी माणुसही जवळचा वाटतो... आता श्रीनगरला कसे पोहोचलो  ह्यात काही  सांगण्यासारखं नाही.... फक्त  अमरनाथ याञेमुळे रस्त्यावर मरणाचं ट्रॅफिक होतं.... श्रीनगर मधे आलो त्यावेळी तिथं वातावरण ठिक नव्हतं ...कर्फ्यु लावला होता.... त्यामुळे राञी शहरात न जाता बाहेर हायवेवरच्याच एखाद्या हॉटेलात रहावे म्हणजे  कर्फ्यु मधे न अडकता सकाळी लवकर निघता येईल असा विचार करुन आम्ही शहराबाहेरच राहीलो... रात्री झोपायच्या तंद्रीत असतानाच खोप्या आणि पियू हातात लहानसा केक घेऊन आमच्या रूम मध्ये आले… रात्रीचे १२ वाजले होते … २७ तारीख … माझा वाढदिवस होता जो ह्या धावपळीत माझ्याही लक्षात नव्हता … पण बाकीच्यांनी आठवणीने सगळी तयारी केली होती … केक-बिक खाल्यानंतर खोप्या , संदीप , पप्या आणि पियू यांनी जी भेटवस्तू दिली , ती बघून तर मला काय बोलावं तेच कळत नव्हतं … मी माझ्या अल्पमतीने लिहिलेल्या blog च्या प्रिंट काढून ते पुस्तक रुपात माझ्या हाती दिलं … आईला आपलं नवजात बाळ पहिल्यांदा पाहिल्यावर जसं वाटत असेल तसंच काहीसं त्यावेळी मला वाटलं … काय बोलणार ? धन्यवाद मित्रांनो …!!!




शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १२ …

                                         सकाळी  डी - झोजीला हॉटेल चा निरोप घेतला . सर्व समान घेऊन बाईक्स पाशी आलो…  बाईक्स वर समान बांधू  लागलो तसे  आमच्या आजूबाजूला हॉटेलच्या आसपासचे लोक जमा झाले … आम्ही त्या सगळ्यांचा  चांगलाच  मनोरंजनाचा विषय झालो होतो … मला डोंबारयाच्या  खेळाची आठवण झाली … लोक आमच्याकडे त्याच कुतूहलाने पाहत होते… हे समान लवकर बांधून होईल आणि इथून लगेच निघता येईल तर बरं  , असं  मला वाटू लागलं … शेवटी आमचं विंचवाचं  बिऱ्हाड घेऊन आम्ही निघालो…. सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं … वर निळंशार  आकाश …जमिनीवरचा रखरखाटपणा  जाउन  आता हिरवळ दिसू लागली … मोठमोठी झाडे अदबीने रांगेत उभी असलेली दिसत होती . अधून मधून काही  ' काश्मिरी कळ्या '   उमललेल्या दिसत होत्या …



                 कारगिलला येण्याआधी आणि तिथून निघताना वाटेत काही लहान मोठी गावं  लागली … त्यातल्या लहान शाळकरी मुलांची निराळीच सवय दिसली… आमच्या गाड्या  ज्या  ज्या गावातून जात होत्या त्या त्या गावातली लहान मुले आम्हाला  टाळ्या मारण्यासाठी  रस्त्यात आडवा हात पसरून उभी होती … सुरुवातीला आम्हाला वाटलं  कि लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत आहेत , परंतु नंतर  लक्षात आल्यानंतर आम्हीही उस्फुर्तपणे  त्यांना प्रतिसाद दिला … गोऱ्या  , लाल गालाची , गोबरी , लहान लहान मुले आम्हाला टाळ्या देण्यासाठी धडपडत होती …हे करताना  त्यांना भारी मजा वाटत होती,  असं  त्यांच्या हसऱ्या  चेहऱ्यांवरून कळत होतं … मी तर आडवा हात पसरूनच बसलो होतो … लहान मुले रांगेत उभे राहून  टाळ्या देऊ लागले … काही खट्याळ  पोरं जोरात फटका मारायची … एकाने तर कहर केला , हातात लहानसा दगड घेऊनच टाळी  देण्यासाठी तो उभा होता … त्याला लांबूनच नमस्कार केला अन सटकलो … उजवीकडे दुधासारख्या पांढर्याशुभ्र , खळाळत  वाहणाऱ्या नदीच्या सोबतीने निघालो… एके ठिकाणी रस्ताच्या कडेला नदीच्या बाजूला दगडाची मोठी आणि उंच भिंत उभारलेली आढळली …आणि तिथे एक बोर्ड लिहिलेला होता जो वाचल्यानंतर मानेवर बर्फाचा थंडगार खडा ठेवल्यासारखं ... अहं .... हा जुना वाक्प्रचार झाला....नविन वाक्प्रचार,  मानेवर डिओड्रंट स्प्रे मारल्यासारखं  वाटलं …!  बोर्ड होता - ' You are under enemy surveillance ...' '  दुश्मन आपको देख रहा है । '  संदीप म्हणाला , " ह्या भिंतीच्या आणि नदीच्या  पलीकडे डोंगरावर पाकिस्तानची चौकी आहे …त्यांना आपला  रस्ता दिसू नये म्हणून ह्या भिंती बांधल्या आहेत…"   सहज दोरी म्हणून दुर्लक्ष करावे आणि तोच जहरी नाग निघावा तसं  बाजूने खळाळत वाहणारी ती  नदी  ' लाईन ऑफ कंट्रोल '  आहे हे समजल्यावर  तिच्या  सौंदर्याचे  भीषणतेत  रुपांतर झाले …एकुणच कारगिल मधे येण्याअगोदर आणि त्यापुढे जात असताना एक प्रकारचा तणाव जाणवत होता. लेह लडाखचं स्वच्छ, मुक्त आणि आनंदी वातावरण या प्रदेशात कुठेतरी हरवुन गेलंय असं सारखं वाटत होतं... कारगिल चा इतिहास असेल किंवा इथे प्रत्यक्षात दिसत असलेल्या सैनिकांच्या चौक्या असतील , वातावरण संघर्षपुर्ण,  धामधुमीचं वाटत होतं... आता रस्त्याने जाताना हिरवी झाडे सोबतीला होती...  पुढे द्रास कडे कुच केलं. द्रास हे अतिशय थंड हवेचं ठिकाण.... तिथेच कारगिल युद्धाचं विजय स्मारक आहे... जणू शिस्तीने उभ्या राहिलेल्या हिरव्यागार झाडांमधून लांबवर आम्हाला विजय स्मारक दिसलं …



 
' ए वतन … ए वतन … हमको तेरी कसम …. ' , ' मेरा रंग दे बसंती चोला … ' अशी देश भक्तीपर गीते लावली होती …त्यामुळे आधीच भारावलेल्या वातावरणाला पार्श्वसंगीत लाभल्याने ते अधिक प्रभावी झाले होते … सैनिक सज्ज झाले होते . थोड्या वेळातच तिथे परेड सुरु होणार होती. आर्मीचा कोणी मोठा ऑफिसर तिथे भेट देणार होता … एकूणच वातावरण रोमांच आणणारं होतं … आम्ही तिथे पोहोचलो … अमर जवान च्या ह्या स्मारकावरील ओळी वाचल्या , आणि सर्रकन काटाच आला अंगावर …. !!!




आम्ही त्या स्मारकासमोर उभे होतो. एकूण १०९१ शहिदांची नावे त्यांच्या रेजिमेंटनुसार त्यावर लिहिली होती . हेच ते वीर ज्यांनी मातृभूमीसाठी कारगिलच्या होमकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली … त्यांचा सन्मान म्हणून त्या सगळ्यांची नावे स्मारकावर कोरली होती … विजय स्मारकाला  अभिवादन करुन आम्ही बाजुला असलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वस्तुंचे प्रदर्शन बघायला गेलो. सुरुवातीलाच हरिवंशराय बच्चन यांची ' अग्निपथ ' ही कविता लिहिलेली दिसली... वीररसाला साजेशी अशी ती कविता आहे ती...! प्रदर्शनात बॅटल ऑफ टोलोलींग, बॅटल ऑफ टायगर हिल ह्यांचे मॉडेल्स बनवलेले, युद्ध साहित्य , बॉम्बगोळ्याचे शेल्स ठेवलेले , कारगिल युद्धातील वीरांचे फोटो होते... ते पाहुन मी भारतीय आहे ह्याचा अभिमान वाटला.  इथे येणारा प्रत्येक जण मातृभुमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांपुढे नतमस्तक होतो... भारलेल्या डोळ्यांनी ते  प्रदर्शन पाहुन बाहेर आलो. त्यावेळी आर्मीचा तो बडा ऑफिसर तिथे आला … आमच्या पेहेरावाकडे बघून आम्ही बायकर्स आहोत हे त्यांनी बरोब्बर ओळखले . त्यांनी आमची आस्थेने विचारपूस केली … आमच्यात एक मुलगीही आहे हे समजल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पियुची प्रशंसाही केली … लहानपणी घरात आलेल्या पाहुण्यांनी  चॉकलेट
देऊन कौतुक केल्यानंतर जसा होतो तसा आनंद
आम्हा सगळ्यांना झाला … तिथे दोन तीन सैनिकांशी बोललो.... " आप लोग कहॉं से है? " त्यातल्या एका सैनिकाने मला विचारलं.  "मुंबई " म्हटल्यावर त्याने स्मित केलं आणि म्हणाला " मुंबई और दुबई मे क्या फर्क है?  " मला कळेना तो असं का विचारत होता ते... " सरजी , मुंबई तो अपने देश मे है..." माझ्या उत्तरावर तो समजुतीने हसला. तो तसा का हसला हे मात्र कळले नाही … तिथल्या सैनिकांनी  कारगिल युद्धाबद्दल माहीती दिली ... " वो सामने पहाड दिख रहां है, वहॉं तक दुष्मन अंदर घुस आया था... " समोरची टेकडी आम्ही बघितली. ती फारतर २०० मीटर लांब असेल... त्यावर टोलोलींग असं लिहीलं होतं. आईशप्पथ....!  म्हणजे ' बॅटल ऑफ टोलोलींग 'ही आम्ही उभे होतो त्याच ठिकाणी झाली होती तर...!  प्रत्यक्ष युद्धभुमीत उभे होतो आम्ही...! " टायगर हिल यहां से कितना दुर है...? " आमच्यातल्या कोणीतरी विचारलं. " वो देखिये सामने टायगर हिल..." आम्ही बघीतलं ... ते शिखर इतकं दिमाखदार दिसत होतं की  त्या शिखराला दुसरं कोणतच नाव शोभलं नसतं... त्याला स्वतःचा वेगळाच असा सार्थ अभिमान होता.…




टायगर हिल काबिज केल्यानंतर आपल्या विजयी जवानांचा हाती तिरंगा घेतलेला फोटो असलेले टी शर्ट तिथे विक्रीस ठेवलेले होते,  ते आम्ही सर्वांनी घेतले. ते नुसते टी शर्ट नव्हते तर एकप्रकारचा बहुमान वाटत होता… , 'ताकद वतन की हम से है....' हे गाणं लागलं होतं .. खरंच ते किती सार्थ आहे हे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही... भारावलेल्या मनाने आम्ही तिथुन निघालो. आज आम्हाला श्रीनगर गाठायचं होतं. बरंच अंतर कापायचं होतं … निघता निघता , " कर चले … हम फिदा … जानोतन सथियो …. " हे गाणं लागलं …. पावलं आपोआप जड झाली ….



शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दुचाकी लडाखायण …भाग - ११

                                  सप्प्... धनुष्यातुन  बाण सुटला आणि 50  फुटांवर ठेवलेल्या लहानश्या बॉक्स मधे घुसला.  त्याबरोबर आम्ही एकच जल्लोश केला. आमच्या हॉटेलचे मालक गलवान अंकल  धनुर्विद्येत भलतेच पारंगत होते... त्यांनी आम्हालाही त्यांचा धनुष्यबाण दिला ... तो चालवणं किती अवघड आहे ह्याचा प्रत्यय तो हातात घेतल्यावर आला . धनुष्याची प्रत्यंचा कितीही जोर लावला तरी खेचली जात नव्हती.  कधी बाण तिरका जात असे तर कधी समोरच पडत असे. पुढे ठेवलेल्या टार्गेटच्या जवळपासही कुणाचा बाण जाईना. गलवान अंकलनी पुन्हा आमच्याकडुन तो धनुष्य घेतला आणि बरोब्बर नेम साधला. Bulls eye....!!!  गल्वान अंकलनी त्यांच्या गेस्टहाऊसच्या आवारात छोटीशी बाग केली होती व उरलेल्या जागेत शेती केली होती... गेस्टहाऊस मात्र आटोपशीर पण छान होतं... आम्ही लेह मधल्या आमच्या वास्तव्यात त्या गेस्टहाऊस वर अगदी मजेत राहीलो. परंतु आता तिथून निघण्याची वेळ आली होती …
                                 आज सकाळीच आम्ही लेह सोडुन आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार होतो. पण आम्ही ते गेस्टहाऊस जणु सोडुन जाऊ नये अशी परिस्थीती निर्माण झाली. आज सकाळपासुनच लेह मधे जोरदार पाऊस सुरु झाला. आणि तो थांबायचं नावच घेईना.... सकाळी 8 वाजता आम्ही निघणार होतो. पण आता 10 वाजले तरी आम्ही काही बाहेर पडु शकलो नव्हतो. गल्वान अंकल म्हणत होते,  "आज मत जाओ, ये बारीश नही रुकेगा… " पण आम्हाला पुढे जम्मु मधे लवकरात लवकर पोहोचणं अतिशय गरजेचं होतं,  कारण आमच्या परतीच्या प्रवासाची ट्रेनची तिकीटे अजुनही confirm झालेली नव्हती. त्यामुळे त्यासाठीची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला एक दिवस आधी जम्मूत जाणे क्रमप्राप्त होते. पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही आपापल्या आवडत्या देवाचं नाव घेऊन गाड्यांवर टांगा टाकल्या.…  भुरुभुरु पाऊस पडतच होता. बाहेर तर पडलो , पण बाहेर पडुन आम्ही  चुक तर केली नाही ना असं  वाटु लागलं.…  पण जसजसे आम्ही  लेह शहर सोडुन पुढे जाऊ  लागलो तसतसे पावसाचे  प्रमाण कमी होऊ लागले. हा खरंच शुभशकुन होता.…  थोडं पुढे गेलो आणि ग्रहण सुटावं तसा सुर्य ढगाआडुन समोर आला… . सहस्ञ किरणांचे उबदार  बाण अंगावर घेत आम्ही  निघालो.…  लेह शहर जवळपास सर्वच बाजुंनी  डोंगरांनी  आणि पर्वतांनी वेढलेले  आहे.  चहा प्यायच्या कप बशितली  बशीच जणू …! लेह शहराबाहेर पडल्यावर मॅग्नेटीक हिल हा एक भुगर्भशास्ञीय  चमत्कार आम्हाला बघायला मिळाला.…  तिथे कसलेही बाह्य  बल न लावता चढणावर २०-३० फुट गाडी आपोआप वर चढते. अगदी बंद गाडी सुद्धा …!  खोप्याने ही गोष्ट पुर्वी आम्हाला सांगितली होती. पण आम्ही त्याला त्या वेळी काही सिरियसली घेतलं नव्हतं…   पण आता माञ निसर्गाचा  हा अद्भुत जादुचा प्रकार पाहुन  आम्ही अगदी थक्क झालो.  अशी  किती रहस्ये हिमालयाच्या  उदरात दडलेली आहेत हे तो कैलासाधिपतीच जाणे...!



                                   रस्त्याने जाताना उन पावसाची पकडापकडी चालुच  होती. लांबवर कुठेतरी काळ्या ढगांनी गच्च भरलेलं आभाळ दिसु लागलं. पावसाची रिपरिप चालु झाली. हा काही आपली पाठ सोडणार नाही हे ओळखुन आमच्या रायडर्सनी  गाडी तशीच पुढे दामटायला सुरुवात  केली.…  पुढे ' फुटु-ला ' नावाचा पास  लागला. सगळ्या रस्त्यावर  रिपरिप पडणाऱया पावसामुळे  चिखलाचा राडा झाला होता आणि  वातावरणात एक प्रकारचा विचिञ  गारठा आला होता. ' फुटु-ला ' पास  जसजसा वर चढत होतो तसा गारठा आणखीनच वाढु लागला. मी तरी मागे बसलो होतो. पण संदिप, खोप्या आणि पप्या  हे गाडी चालवत होते , समोरुन येणारा थंडगार वारा थेट त्यांच्या अंगावर येत होता. हातात हँडग्लोज होते तरी बोटे थंडीने आखडली  होती. मधे थोडा वेळ ब्रेक  घेतला . अंगात थंडी इतकी भरली  की नीट उभंही राहता येत  नव्हतं. सु सु च्या ब्रेक  नंतर संदिप म्हणाला,  "आता  जरा बरं वाटतंय " कसं  काय ? म्हणुन विचारलं तर म्हणाला, " मॅन व्हर्सेस वाईल्ड वाल्या बेअर ग्रिलस  ची टेकनिक वापरली. थंडीने आखडलेल्या  बोटांवर सुसु केली. फरक  पडला जरा.…   " मलाही तसं करावसं वाटलं पण आमची टाकी नुकतीच रिकामी करुन आल्याने माझा भलताच हिरमोड झाला…  तसंच कुडकुडत  पुन्हा आपापल्या बाईक्सवर बसलो अन् निघालो थोडं पुढे जातो न जातो तोच गाड्यांची  रांग लागलेली दिसली. इतका वेळ जरा चुकल्या चुकल्या  सारखं वाटत होतं पण समोरचा बंद रस्ता बघुन वाटलं  की आपण योग्य रस्त्यावर  आहोत.…  ह्या सबंध लडाखायणात  असा एकही पास (घाट) नव्हता की जिथे आम्हाला रस्ता  चांगल्या स्थितित मिळाला. रस्ता  दुरुस्तीच्या कारणामुळे  प्रत्येक ठिकाणी आम्हाला थांबावं लागत होतं आणि 'फुटु-ला'  पास ह्या गोष्टीला अपवाद कसा असेल…?  अर्ध्या तासाने रस्ता मोकळा झाला. आता आम्हाला कारगिल च्या दिशेने जायचे होते. मातीचा, खडीचा रस्ता, बाजुला नुकतीच वयात आल्यासारखी, अल्लड, खळाळत वाहणारी सुरु नदी आमची साथ देत होती. जवळपास, सर्वच रस्ते नदीच्या मार्गाने जात होते. सुमारे ६ वाजता आम्ही कारगिल ला पोहोचलो. युद्धभुमी ...! तिथे पोहोचल्यावर , तिथल्या सैनिकांच्या चौक्या पाहिल्यावर एक वेगळीच अनुभूती आली …वीररसाने भारलेलं  वातावरण …! लाईन  ऑफ कंट्रोलला अगदी खेटूनच होतो…सरहद्द …!    तिथे हॉटेल  डी- झोजीला  म्हणुन एक भलं मोठं हॉटेल होतं. एखाद्या जुन्या काळातल्या गढीवजा आकाराचं आवाढव्य बांधकाम होतं त्या हॉटेलचं....!  आजची रात्र इथेच काढायची  ठरवली … गाड्यांवरचं सामान काढुन आपापल्या रुमवर नेणे हे सगळ्यात अवघड काम वाटे. कारण सबंध दिवस कष्टप्रद प्रवास केल्यानंतर जेव्हा समोर विसाव्याचं ठिकाण दिसत असेल तर पावलं आपोआप जड होतात. रुममधे कसेबसे गेलो. अत्यानंदाची गोष्ट म्हणजे रुम मधे टिव्ही होता . तब्बल १०-११ दिवसांनंतर आम्ही आज टिव्ही पाहणार होतो. सितामाईला अशोकवनात प्रभुरामचंद्रांची अंगठी पाहील्यावर झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आनंद आम्हाला तो टिव्ही बघीतल्यावर झाला…. कोणता चॅनल बघु अन् कोणता नको असं झालं. हॉटेलवर STD होता. तो बघितल्यावर मला कॉलेज ची आठवण आली … घरच्यांना खुशालीचे फोन झाले.…  खुशाली म्हणण्यापेक्षा  ' अजून जिवंत आहोत '  हे कळवण्यासाठी फोन झाले ….  राञीच्या  जेवणात ताटानुसार पैसे होते, आणि ते खुपच जास्त  असल्याचे सर्वांना जाणवलं. त्यामुळे  जेवण हे "अलाकार्टे " पद्धतीने मागवुया म्हणजे विनाकारण जास्त पैसे जाणार नाहीत  असे पियु म्हणाली. ही नविनच भानगड मी ऐकत होतो. अलाकार्टे म्हणजे सर्व पदार्थ न घेता निवडक पदार्थ जेवणासाठी घ्यायचे व फक्त  त्या पदार्थाचे होतील तेवढेच पैसे द्यायचे. हि कल्पना सगळ्यांना आवडली . त्यानंतर सर्वानुमते अलाकार्टे च्या नावानं चांगभलं केलं...' अरे अलाकार्टे आहे , नो प्रोब्लेम ...,  अलाकार्टे आहे , हे मागवा , ते मागवा ...' करत बरेच वेगवेगळे पदार्थ घेतले . आणि जेव्हा बिल मागवलं तेव्हा मात्र काय झालं असेल हे सूज्ञ वाचकांस सांगणे नलगे …!! भलं  मोठं बिल आमच्याकडे मिश्किलपणे पाहत आहे  असं  मला जाणवलं … 





रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

दुचाकी लडाखायण... भाग - १०

                            पँगाँग लेक... !  लडाख मधलं  असं  ठिकाण कि ते जर नसतं  तर तिथल्या प्रदेशाच्या सौंदर्यात कुठेतरी कमीपणा आला असता . सर्व साज शृंगार केलेली नववधू आणि कपाळावर टिकली नाही , अशी काहीतरी अवस्था  झाली असती , पँगाँग लेक नसता तर ...!!!   आज  आम्हाला पँगाँग लेक ला जायचे होते. आधल्या दिवशी   गॅरेजवर भेटलेल्या त्या मित्राने  पँगाँग लेक वरून येताना त्या  भयानक शैतान नाल्याबाबतीत सांगितलेल्या सुरस गोष्टीं आम्ही ऐकल्या होत्या.  शैतान नाल्यासंदर्भात तो म्हणाला होता की,  संध्याकाळ झाली की त्या नाल्यातलं पाणी वाढतं. कारण दिवसा उन्हामुळे जमा झालेलं बर्फ वितळते  आणि मावळतीच्या वेळी ते लहान लहान ओहोळांमार्फत एकत्र येऊन शैतान नाल्याला येऊन मिळते. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह संध्याकाळी त्या नाल्यातून वाहातो. जर पँगाँग लेक ला जायचे असेल तर एका दिवसात जाऊन येणे अशक्य आहे. तुम्ही रात्री तिथे रहा आणि दुसऱया दिवशी सकाळी निघा असा सल्ला त्याने आम्हाला दिला. परंतु आमच्या ठरलेल्या वेळापत्रकानूसार पँगाँग लेकला रहाणे शक्य नव्हते. तो लेक जवळपास 150 किमी लांब होता म्हणजे एकूण अंतर 300 किमी होणार होते. एवढ्या लांबचा पल्ला बाईक वर एका दिवसात जाणे आता आम्हाला शक्य नव्हते  त्यामुळे मग एका दिवसासाठी गाडी करुन जाणे याशिवाय चांगला पर्याय आम्हाला तरी दिसत नव्हता. हॉटेलच्या मालकाने एक गाडी सांगितली. गाडीने जाण्याचा आणखी एक फायदा असा होता की आमच्या रायडरर्सना आरामही मिळणार होता. हमने एक तिर से दो शिकार किये.....   सकाळी 7 च्या सुमारास गाडी आली.  लहान असताना शाळेच्या सहलीला जावे तसे आम्ही त्या गाडीत जाउन बसलो.‍.. आता आरामात जाता येणार होतं. पप्या तर मागच्या सिट वर आडवाच झाला. पँगाँग ला जाताना मधे चांग- ला ही खिंड लागते. घाट सुरू होण्याआधी आम्ही एका पंजाबी हॉटेल वर  जाऊन मस्त परांठे हाणले... बऱयाच दिवसांनी त्या राईस,  नुडल्स ला पकलेले आम्ही पराठ्यांवर तूटून पडलो. नाष्टा झाला, निघालो... चांग- ला चा घाट सूरू झाला.....



आम्ही गाडीतून बाहेर वर पाहिलं तर वरचा पर्वत गडद पांढऱया धुक्यात हरवुन गेलेला दिसत होता. घाटाने वर गेलो तसे गाडीच्या पुढच्या काचेवर थेंब पडत असलेले दिसले. आमच्या गाडीचा ड्रायवर म्हणाला "उपर बरप गिर रहा है। "  बर्फ ....!!! खरीखुरी हिमवृष्टी ...! आईशप्पथ ...! आमच्या मनोरथाचे घोडे ' बर्फात ' नहाले .



 थोडे आणखी वर गेलो,  वर आकाशातुन कुणीतरी कापुस पिंजुन खाली टाकत आहे असं वाटत होतं. वर पोहोचलो,    वातावरण तर असं होतं की आम्ही कुठल्या तरी अद्भुत आणि जादुई नगरीत आलोय. बर्फाचे पांढरेशुभ्र कण हवेबरोबर कसेही उडत येत होते. हिमवृष्टी अनुभवायचा माझा पहिलाच प्रसंग... सगळं वातावरण भारलेलं. ड्रायवर ने गाडी थांबवली.  शाळा सुटल्यानंतर लहान मुले धावत पळत बाहेर येतात तसे आम्ही गाडीबाहेर पडलो. मजबुत थंडी होती बाहेर,   कुडकुडत उभे राहीलो. चांग -ला  लिहिलेल्या पाटीसमोर उभं  राहून फोटो काढून घेतले ... पुरावा म्हणून...!



                  खोप्याच्या डोक्यात नविन कल्पना आली.  एक काचेचा ग्लास घेतला बर्फाने पुर्ण भरला आणि त्यात कोकाकोला टाकुन पिऊ लागला. कोक ऑन द रॉक्स .... धमाल आली.  तिथेही खोप्या आणि पियु लहान मुलांसारखं बर्फात जाऊन खेळत होते. ह्या आख्या लडाख टूर मधे कोणती जडीबुटी खाल्ली होती देव जाणे... आम्ही माञ लगेच गाडीत जाऊन बसलो. पुढे निघालो . वळणं तर अगदी पाचवीला पुजली होती.  मधे रस्त्यात एका ठिकाणी काळ्या केसांचे याक दिसले. निसर्गाने खडबडीत रंगाचे दगडी कपडे काढून हिरवीगार शाल लपेटून घेतलेली दिसली . थोडा पुढे जातो न जातो तोच खोप्या जीव खाउन ओरडला ... " वूल्फ .... वूल्फ ..." . ड्रायवर ने करकचून ब्रेक दाबला ... मागे झोपलेला पप्या घाबरून तडफडत जागा झाला... बघतो तर तो कोल्हा  नसून असाच एक गावठी  केसाळ कुत्रा होता ... सगळे पक्के वैतागले खोप्यावर ...! त्यानंतर उगाचच आम्ही त्याची खेचू लागलो ...  बरेचसे डोंगर पार केल्यानंतर एका वळणावर दुरवर पँगॉंग लेकचं बारीकसं  प्रथम दर्शन आम्हाला घडलं. काळ्या राखाडी पर्वतांच्या पार्श्वभुमीवर पँगॉंग लेकचं आकाशी रंगांच्या विविध रंगछटा असलेलं प्रथम दर्शन डोळ्यांना आणि मनालाही अतिशय सुखावह असं वाटत होतं.



                परंतु तिथं पोहोचलो आणि आमचा भ्रमनिरास झाला. समोर विस्तीर्ण पँगॉंग लेक पसरलेला. परंतु   कलर मुघले आझम बघण्यासाठी जावं आणि समोर पुन्हा तोच जुना ब्लॅक अन् व्हाईट सिनेमा लागावा तसं काहीसं झालं. बरेच ढग जमा झाल्याने  आकाशाची निळी नितळाई काही त्या उतरली नव्हती. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे मात्र उतरले... असे म्हणतात कि चांगल्या वातावरणात पँगॉंग लेकमध्ये निळ्या रंगांच्या आठ वेगवेगळ्या छटा  दिसतात . परंतु आमच्या नशिबात बहुदा ते पाहणं नव्हतं . पँगॉंग लेकचं आडवं पसरलेलं एक टोक लांबवर कुठेतरी पर्वतरांगांमधे हरवुन गेलेलं ...





थोड्या वेळाने वरची ढगांची गर्दी काही काळासाठी हटली. आणि त्या  निळ्या नितळाईचं  हलकंसं  दर्शन आम्हाला झालं ... ते आम्ही अधाशासारखे  डोळ्यात साठवून घेऊ लागलो.


पँगॉंग लेक ने आमचा थोडा भ्रमनिरास केला . आम्ही  निघालो ते भविष्यात पुन्हा इथे येउन ह्या पँगॉंग लेकची निळी नितळाई अनुभवण्याचा पक्का इरादा करूनच....!



रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ९


                   आज सकाळी उठल्यापासूनच मनात धाकधुक सुरु झाली.... आता आम्ही जगातल्या हाय्येस्ट मोटोरेबल रोडवर जाणार होतो... खारदुंग-ला पास ! लेह पासून फक्त ५० किमी लांब .... आणि तिकडे जायचा रस्ताही लेह शहरातून दिसत होता .... आम्ही एकदमच १८३८० फुटांवर जाणार होतो .... भीती अशासाठी होती कि , टांगलांग - ला हे  खारदुंग-ला पास पेक्षा उंचीने कमी होतं , त्या तिथे माझी ही  हालत  झाली ,  इथे आता तर त्यापेक्षाही अधिक उंचीवर जायचे होते ... त्यामुळे मी तिथे जाईन  तर दुचाकीवर ... पण येताना मात्र चार चाकीवर येईन कि  चार खांद्यांवर ...?? ही भीती मनात घर करून बसली ... इतकी कि मी मेडीकल मध्ये जाऊन ऑक्सिजनचा एक छोटा सिलिंडर पण विकत घेतला ..., उगाच रिस्क कशाला घ्या...!  आम्ही निघणार तेवढ्यात खोप्याचं  लक्ष त्याच्या बुलेटच्या मागच्या टायरकडे गेलं .... त्याचा तो टायर  आणि मागील मडगार्ड घासून  टायरची झीज सुरु झालीय असं  लक्षात आलं ... हि  खरंच चिंतेची बाब होती... असाच जर  टायर  घासत राहिला  तर तो फुटण्याचा संभव होता ... आणि मुख्य म्हणजे त्यावरील सामानामुळे आणि वजनामुळे तर तो नक्कीच फुटला असता ... आता काहीही करून garage  गाठणं भाग होतं. आम्ही शहराच्या बाहेर एका garage मध्ये गेलो ... तिथे बाकीचे लोकही आपापल्या बुलेट दुरुस्त करून घेण्यासाठी आले होते ... गाड्यांच्या रांगा  लागल्या होत्या , मग थांबणं तर आलंच ... आम्ही वर  खारदुंग-ला च्या दिशेने बघितलं ... वर खूप काळे ढग  जमा झाले होते ...  तिथे जोरदार पाउस आणि हिमवृष्टी होणार अशी चिन्हे दिसत होती ... आमच्या हॉटेलचा मालक निघताना म्हणाला होता कि तिथलं  वातावरण सारखं  बदलत असतं ... सकाळी तर तसं काही  दिसत नव्हतं ... आणि आता  वर जोरदार हिमवृष्टी होतेय हे बघून तर आम्ही ' आता काही खरं  नाही ! ' असेच चेहरे केले ... 
         इकडे garage  वाल्याने आमची गाडी हातात घेतली... तो त्याच्या कामात भलताच  तरबेज होता ... गाडीला बघता क्षणीच त्याने काय प्रॉब्लेम  आहे ते सांगितलं ... मागच्या टायरमध्ये लोखंडी रॉड  टाकून मडगार्ड वर उचलून घेतलं... मी , पप्या  आणि संदीप तिथे असलेल्या दुसऱ्या  बुलेट बघत बसलो... २-३ तास त्यातच गेले , काम झालं , आम्ही निघालो . तोपर्यंत खारदुंग-ला पास वर हिमवृष्टी होऊन गेली होती ... आमचं  नशीब चांगलं म्हणून खोप्याची गाडी garage  ला घेऊन जायला लागली नाहीतर आम्ही त्या हिमवृष्टीत नेमके सापडलो असतो ... खारदुंग-ला ला  जाताना रस्ता मात्र चांगला होता . असाच रस्ता असेल तर मग बरं  आहे असा विचार करत असतानाच एकदम दगड मातीचा रस्ता सुरु झाला ... काही अंदाज बांधू लागलो कि निसर्ग त्याचे झाकून ठेवलेले पत्ते आमच्यासमोर उलघडत असे ... unpredictable ...!!! जसजसे वर जाऊ तसतसे रस्त्याची परिस्थिती बिघडत होती ... खरं सांगायचं  तर त्या ठिकाणी रस्ता तयार करणं हेच जिकिरीचं  काम आहे ... खडक असा तो कुठे नाहीच... नुसती ठिसूळ माती ... वळणावळणाचे U टर्न घेत आम्ही वर चढू लागलो.... बाजूची ठिसूळ माती घसरून खालच्या रस्त्यावर पडत होती ... आम्ही मध्यापर्यंत आलो... इथून पुढे रस्त्यावर बर्फाच्या राशी पडलेल्या दिसू लागल्या ... त्यांतून झिरपणाऱ्या  पाण्यामुळे आणि ठिसूळ मातीमुळे रस्त्यात बऱ्याच ठिकाणी चिखलाचा राडा झाला होता ....






   संदीपची  आणि खोप्याची गाडी व्यवस्थित होती , पण पप्याची गाडी सारखी मागे मागेच राहत होती... आम्ही एका ठिकाणी थांबून त्याची वाट पाहू लागलो... त्याची गाडी प्रॉब्लेम  द्यायला लागली ... थोड अंतर गेलं  कि गरम होऊन बंद पडत होती ... पप्या अगदी मेटाकुटीला आला होता ... रस्त्यात कुणाच्यातरी  २ यामाहा FZ  गाड्या बंद पडलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या आम्ही मागे पहिल्या होत्या  ... आणि दुर्दैवाने पप्याची गाडी यामाहा FZ च होती.... आम्ही खारदुंग-ला वर पोहोचलो तरी पप्या  अजून  कसा आला नाही म्हणून  आम्ही पुन्हा खाली यायला निघालो तर महाशय हळूहळू येत असलेले दिसले... तो केवळ पप्या  होता म्हणून वरपर्यंत त्याची यामाहा गाडी घेऊन येऊ शकला ... मानलं साल्याला  ...! 

                            
    

               
                    ' खारदुंग-ला वर १० मिनिटांच्या वर थांबू देत नाहीत ' , ' सगळ्यात उंच ठिकाणचा रस्ता असल्याने श्वास घायला फार त्रास होतो ' , वगैरे वगैरे अशी मौलिक माहिती आधीच  सांगून खोप्याने माझं  उरलं  सुरलं धैर्यही संपवलं  होतं ... वर कोणीच नसेल असा कयास बांधून माथ्यावर पोहोचलो आणि बघतो तर काय ...?? वर माणसांची जत्राच भरल्यासारखी वाटत होती .... लहान लहान मुले बर्फात खेळत होती... बरीच वयस्कर माणसेही तिथे आम्हाला दिसली... जगातला सगळ्यात उंच cafeteria ही  तिथे होता . आता बोला....!! आणि इतक्या उंचीवर श्वासाचा ही  काही त्रास जाणवत नव्हता .... पुन्हा पोपट ...!!  घाबरून विकत घेतलेला ऑक्सिजनचा सिलिंडर वाया गेला... ! पण वरचं  वातावरण फारच आल्हाददायक होतं ...  सर्वत्र बर्फाच्या पांढऱ्या राशी ... मस्त उन पडल होतं ... आणि त्याचं   परावर्तन होऊन डोळ्यांसमोर प्रारणं  चमकत होती... आम्ही सर्वांनी खारदुंग - ला लिहिलेल्या पाटी  समोर उभं  राहून फोटो काढून घेतले ... 
              

                          खर तर आम्ही पुढे नुब्रा vally  लाही जाणार होतो पण ते आणखी १०० किमी पुढे होते आणि आधीच निघायला उशीर झाल्याने आमचा नाईलाज झाला... खारदुंग - ला पर्यंत जाऊन आम्ही पुन्हा माघारी फिरलो... परतीच्या वाटेवर पप्या  कुठे गायब झाला काही कळलं  नाही , तो आम्हाला डायरेक्ट जेवणाच्या हॉटेलवर भेटला... जेवण झाल्यावर आम्हाला भलताच कंटाळा आला... खोप्या आणि पियू म्हणत होते कि थिकसे मॉनेस्ट्री बघायला जाऊया , पण आम्हाला जाम  वैताग आला होता , मी संदीप आणि पप्या रूम वर जाऊन पडलो ... खोप्या आणि पियुचा उत्साह खरच हेवा वाटण्याजोगा होता ... ते दोघे गेले ती मॉनेस्ट्री बघायला ... ! पण नंतर त्या मॉनेस्ट्रीचे फोटो बघितले आणि तिथे न जाऊन आम्ही बरंच  काही मिस केलं  असं  वाटू लागलं ... संध्याकाळी संदीप ने त्याची  गाडी garage  मध्ये नेली ,  गाडीचे शॉकअब्सोर्बेर खराब झाले होते , ते बदलले ...  पप्याच्या गाडीचेही  काम निघाल्याने आम्ही दोघे दुसऱ्या  garage  मध्ये गेलो... तिथे एक जण  आम्हाला भेटला , तोही तिथे त्याची बाईक दुरुस्त करायला आला होता .  त्याने कथन केलेले अनुभव ऐकले आणि आम्ही सर्दच झालो... रोहतांग मध्ये एका ओढ्यात पडून त्याचे पाकीट , इतर महत्वाची कार्डे , कागदपत्रे वाहून गेली ...., पँगाँग लेक वरून येताना शैतान नाल्यात स्वतः वाहून जाता जाता वाचला , खारदुंग ला मध्ये गाडीवरून धडपडला , गाडी बंद पडली ... आणि १० किमी च्या वर अंतर गाडी ढकलत घेऊन आला .... हे ऐकल्यावर मात्र आम्ही आतापर्यंत झालेल्या प्रवासात चांगलेच सुदैवी ठरलेले होतो असं  वाटू लागलं.... एव्हढं  सगळं  त्या माणसाबाबत घडलं  पण त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा किंवा नैराश्येचा लवलेशही नव्हता ... उलट ते आम्हाला सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज दिसत होतं .... युद्ध जिंकून आलेल्या  सैनिकाला  त्याच्या जखमांची काहीच पर्वा  नसते ....  खरंच  , हा प्रदेशच असा आहे कि तिथे माणसाचा कस लागतो ... एकाच वेळी  स्वर्गासम सृष्टीसौंदर्याची प्रचीती येते  आणि त्याचवेळी नरकयातनाही  भोगाव्या लागतात...  आणि आम्ही त्याचा  ' याची देही याची डोळा ' अनुभव घेत होतो ...

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

दुचाकी लडाखायण .... भाग - ८


                   लेह मध्ये पोहोचायला रात्रीचे ८.३० -९ झाले ... राहण्याची व्यवस्था कुठे करावी हे ठरवण्यात बराच वेळ गेला ....एकतर भयंकर दमून आम्ही कसेबसे लेह गाठले होते ... बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर खोप्याने आधीच माहिती काढून ठेवलेल्या रेस्टहाउसचा शोध लागला ... २५० किमी च्यावर खडतर प्रवास केल्यावर अगदी कोलंबसला अमेरिकेचा शोध लागल्यानंतर होणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटींनी आनंद  आम्हाला त्या " गल्वान गेस्टहाउस " चा शोध लागल्यानंतर झाला ... हे गेस्टहाउस मुख्य शहरापासून थोडे बाहेरच्या बाजूला होते ... रात्री १० च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो तर  तिथे सर्वत्र सामसूम....!!  अंधार ....गल्वान गेस्टहाउस  म्हणजे हिंदी हॉरर  फिल्मचं  लोकेशन वाटत होतं ...त्यात आम्ही रात्री उशिरा तिथे पोहोचलो होतो त्यामुळे आपोआपच वातावरण भयपटाला साजेसं असच  झालं होतं ... पण आम्ही इतके दमलो होतो , वैतागलो होतो कि एखादा खरा भूत जरी समोर आला असता तरी आम्ही '' सुबुको आओ ... अभी जावो " असंच  काहीसं  म्हटल असतं ... रूम मध्ये गेलो मऊ उबदार रजया अंगावर घेतल्या ... आणि जगाचा तात्पुरता निरोप घेतला...
                   सकाळी ९-१० च्या सुमारास  जाग  आली... डोळे उघडल्यावर बघितलं ,  गल्वान गेस्टहाउस  च्या रूमस चांगल्या होत्या , भिंतींना निळसर रंग ....खाली मऊ  गालीचा ,  छतावर मोठ मोठे बांबू आडवे टाकलेले ... खिडक्यांना पडदे होते... सकाळी मस्त उन  पडल  होतं  त्यामुळे प्रसन्न वाटतं होतं.... बाहेर येऊन बघितलं तर रात्री जसं  वाटलं होत तसं हे गेस्टहाउस नव्हतं ...  समोर छान पैकी एक बगीचा होता ... त्यापुढे एक लहानसे शेड उभारले होते त्यात टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या ... गेस्टहाउस च्या मालकाने बाजूला लहानशी शेतीही केली होती.. कंपाउंड च्या बाजूने रांगेत उभी केल्यासारखी उंचच उंच झाडे लावली होती...


                       रात्रीच्या आणि दिवसाच्या वातावरणात जमीन आसमानाचा फरक होता .... आम्ही फ्रेश होऊन    नाष्टा केला... ओम्लेट - ब्रेड , चहा  आणि घरून आणलेल्या शंकरपाळ्यांवर  ताव मारला. लेह च्या आजूबाजूला जिथे चीनची हद्द जवळ आहे , म्हणजे पँगाँग लेक , खारदुंग ला , नुब्रा valley   अशा ठिकाणी जाण्यासाठी पास लागतो .. तो काढण्यासाठी आमच्या हॉटेलच्या मालकाला सांगितले... ते पास येईपर्यंत आम्ही लेह मध्ये जाऊन गाड्या सर्विसिंग करून घेण्यासाठी बाहेर पडलो.... आमच्या गाड्या जवळ पास १००० किमी चालल्या होत्या , त्यामुळे ऑईल बदलणे व  इतर दुरुस्तीसाठी आम्ही लेह शहरात आलो ... आणि बघतो तर काय... ? जिकडे तिकडे बुलेटच बुलेट... ' विना बुलेट लेह शहरात फिरण्यास मनाई ' असा काहीसा अलिखित नियम असावा , इतक्या प्रमाणात बुलेट दिसत होत्या ...जगात दोनच ठिकाणी  रॉयल  एन्फिल्ड  बुलेट जास्त प्रमाणात दिसू शकतात .. एक म्हणजे लेह  आणि  दुसरं ठिकाण  म्हणजे  रॉयल  एन्फिल्ड  बुलेटची  factory .... !!!  बुलेट  किती प्रकारच्या असू शकतात हे तिथेच कळेल.... आम्ही garage मध्ये गेलो तर तिथेही सगळ्या बुलेट दुरुस्तीसाठी आलेल्या.... त्या  बघून पप्याने  लेह मध्ये एक  बुलेटचं  garage  टाकूया , असा एक बिझनेसचा प्लान बोलून दाखवला ... खोप्याही त्याला तत्वतः मान्यता देणार एवढ्यात मी  जोरदार हसलो आणि तो प्लान बारगळला ., नाहीतर एका हातात पाना आणि दुसऱ्या  हातात स्क्रू ड्रायवर घेऊन खोप्या लगेच तयारच झाला असता... असो...! आज आमचा कुठेही फिरण्याचा कार्यक्रम नव्हता .. दुपारी जेवलो आणि मस्त ताणून दिली ... संध्याकाळी जवळचं  एखाद ठिकाण करावं  म्हणून आमच्या गेस्टहाउसच्या मागे असलेल्या शांतीस्तूप कडे आम्ही निघालो..... हिमाच्छादित पर्वताच्या पार्श्वभूमीवर पांढरेशुभ्र शांतीस्तूप  उठून दिसत होते ...



                  शांतीस्तूप आणि त्याचं  विस्तीर्ण अंगण मावळतीच्या प्रकाशात अतिशय विलोभनीय दिसत होतं ... स्तुपावर गौतम बुद्धांच्या जीवनावरची काही प्रसंगे दर्शवली होती ....लाल , पिवळ्या, निळ्या , हिरव्या रंगाच्या पताका  फड फड करीत  त्यावर लिहिलेली  प्रार्थना ,  शांतीचा संदेश वाऱ्याबरोबर दूरपर्यंत पसरविण्याचे काम करीत होत्या .... तिथलं  बुद्धदर्शन  खरच  मनाला शांती देणारं  होतं ... नाव अगदीच सार्थ होतं ... शांतीस्तूप ...!!



                    शांतीस्तूपाच्या समोरच्या डोंगरावर लांबवर लेह palace दिसत होता . काही लोक  कॅमेऱ्याची  तोंडे तिकडे वळवून दूरवर असलेल्या लेह palace ची छायाचित्रे घेण्यात मग्न दिसत होती ... आम्हीही तिथे आमचे फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेतली ... काही पर्यटक  तिबेटी लोकांचा पोशाख अंगावर चढवून स्वतः चे फोटो काढून घेत होते ... लोकांना कोणत्या गोष्टी करण्यात मजा येईल हे सांगणं कठीण आहे ....



                 अंधार पडला तसे आम्ही तिथून  लेह शहर फिरण्यास निघालो... लेह फिरताना इतक्या डोंगर दऱ्या पार करून आलो आहोत असं वाटतच नव्हतं ... इथेच कुठेतरी गोव्याला आल्यासारखं  वाटत होतं... दुकाने  दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती ... आणि बाजारपेठ माणसांनी फुलून आली होती ... तिथे बऱ्याच तिबेटी वस्तू , स्वेटर्स , jackets  , शाली , खेळणी  विकण्यासाठी आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या होत्या ... तिबेटी वस्तूंच्या एका दुकानात गेलो , तिथे विविध प्रकारच्या धातूच्या वस्तू , रंगीबेरंगी खडे मांडलेले होते ...ते एकदा फिरून बघितलं  अन  मी बाहेर पडलो , आणि इतर दुकानांची विंडो शॉपिंग करू लागलो .... खोप्या आणि पियुने काहीतरी ३-४ निळ्या रंगाचे दगड विकत  घेतले ... पियुने एकदम खुशीत येऊन आम्हाला ते दगड दाखवले ....' कितीला ? ' असं विचारल्यावर तिने जी किंमत सांगितली ती ऐकून  मला पुन्हा एकदा हाय अल्टीट्युड  सिकनेस आल्यासारखं  वाटू लागलं .... खोप्याचा चेहराही सहा महिन्याच्या आजारातून उठलेल्या माणसासारखा झाला होता ... पण  बिचारा उसणं हास्य चेहऱ्यावर आणून उभा होता .... शॉपिंग तर झाली ... आता पोटपूजा ...! एका हॉटेल मध्ये गेलो .... मस्त चायनीज नुडल्स , राईस हाणला....कोल्ड्रिंक झालं ... जेवण झालं  तसं  जास्तच थंडी जाणवू लागली....  गेस्ट हाउस  वर जाऊन पडलो ... आजचा दिवस असाच लेह शहर फिरण्यात आणि शॉपिंग करण्यात घालवला  आणि ' जीवाचं लेह '  करून घेतलं...
                    संध्याकाळी शांती स्तूप ला जाताना त्याच्या पलीकडे लांब उंच असा  जगातला हाय्येस्ट मोटोरेबल रोड  खारदुंग-ला पास ( उंची १८३८० फुट ) आम्हाला दिसला होता ... आता उद्या आम्ही जगातल्या सगळ्यात उंच रस्त्यावर असणार होतो .... top  of  the  world ....!!!