शुक्रवार, २० मार्च, २०१५

लोकल डायरी -- ६

                                                               
                   मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी 8 वाजून 24 मिनीटांची जलद लोकल आज 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे  .....       मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस को जाने वाली 8 बजकर 24 मिनट की तेज लोकल आज 5 से 10 मिनट देरी से चलाई जायेगी .... mumbai chhatrapati shivaji ......
प्लॅटफॉर्मवर   शिरता शिरताच  अनाउंसमेंट ऐकायला आली . सकाळ सकाळी फालतू बातमी मिळाली .... आता सगळा  दिवस बकवास जाणार ... आपल्याला जेव्हा लवकर  जायचं असतं नेमकं त्यावेळीच लोकलला असा काहीतरी  प्रॉब्लेम येतो . मी आमच्या नेहमीच्या जागी जाऊन पाहतो तो प्लॅटफॉर्मवर  नायर अंकल , सावंत उभे होते . भरत आणि भडकमकर गाडी पकडण्यासाठी प्लेटफॉर्मच्या अगदी टोकावर जाउन उभे राहिले... नेहमीप्रमाणे !  गाडी प्लॅटफॉर्म वर शिरता शिरताच ते चालत्या गाडीत चढतात . मीही पूर्वी तसं करायचो , पण एकदा धावती  गाडी पकडण्याच्या नादात  प्लॅटफॉर्मवरच  साष्टांग नमस्कार घातल्याने मी तो नाद सोडून दिला .
" गुड मॉर्निंग नायर अंकल ....   काय म्हणताय सावंत .... ? "  आल्या आल्या मी  नेहमीप्रमाणे दोघांची विचारपुस केली .
" काही नाही बाबा... गाडीची वाट बघतोय ...  दुसरं काय करणार ? " सावंत गाडी  येण्याच्या दिशेने डोकावून बघत होते .
" काय झालय गाडीला ?"
"   च्यायला , नेहमीप्रमाणे पेंटोग्राफ तुटला... "
"  ये साला पेंटोग्राफ  बी  अपने हिंदी फ़िल्म के हीरो के दिल जैसा लगता   ए ... बार बार टूटता है ... !  " नायर अंकल डोळा मारत म्हणाले   आणि आम्ही त्यांच्या ह्या उपमेची दाद देत त्यांना टाळी दिली .
" रोजचं   नाटक  आहे यार  ...!   आता  उल्हासनगर वरुन सगळे लोक  डाऊन  करून येणार ... "   सावंत  वैतागाने म्हणाले .  आम्ही आमच्या आजुबाजुला  पाहिलं .... प्लॅटफॉर्म  इंडिया - पाकिस्तान  मॅचच्या स्टेडियमसारखा    लोकांनी   खचाखच  भरला होता.
" आज काय आपल्याला बसायला जागा मिळेल असं वाटत नाही. "                     
" भडकमकर आणि भरत गेलेत पुढे .... बघू काय करतात ते ...."
" शरद आज  आला नाही  काय ? "
" नाय दिसला रे ... नायर साब आपको दिखा क्या शरद ? "
"  नय .... आज बी लेट आयेगा लगता ऐ .... कल तो किसीको कुछ बताए बिना चला गया ... क्या हुआ ए  उसको ...?   "
" हो , खरंच...     काय झालं असेल हो सावंत त्याचं ? काल जाम टेंशन मधे वाटला ... "  
"   हम्मम.... मला डाउट वाटतोय .... नक्की कायतरी पोरीबिरी चा मॅटर असेल ... "
" कशावरून .... ? "
" अरे हे असं  उदास उदास राहणं ....  कुणाशी काहीही न बोलणं ....आणि मुख्य म्हणजे दाढी  वावणं   हे कशाचं लक्षण आहे असं तुला वाटतं ?  "  
"  आयला .... हे असं असेल का ? "
" मग काय ?  अनुभवाचे बोल  आहेत बाबा ...  "
" अनुभवाचे बोल ..? म्हणजे सावंत .... तुम्ही पण हे असं दाढी वाढवून ....? "  मी असं बोलत असतानाच नायर अंकल सावंतांना म्हणाले , " वो लेडी आपको बुला रही है ..."
मी त्यांच्या   मागे  पाहिलं   तर त्या ह्याच बाई होत्या ज्यांनी    त्या दिवशी सावंतांकडे बघुन स्माईल केलं होतं .  आणि सावंत सुद्धा एखाद्या प्रेमात पडलेल्या कॉलेजकुमारासारखे वागत होते .  प्रेमाला वय नसतं हेच खरं ... ! सावंत तिकडे गेले . मी त्या दोघांकडे पहात उभा राहिलो . सावंतांच्या दाढी वाढवण्यासाठी ह्या बाई कारणीभूत असाव्यात का ?   एक शंका मनात येऊन गेली .  विचार करता करता माझं  लक्ष सहज  समोरच्या प्लॅफॉर्म वर गेलं . पहातो तर समोरच्या प्लॅटफॉर्म वर  अँटीव्हायरस उभी   ! अरे देवा !  तिने ट्रेन बदलली वाटतं ...
"  ये लेडी कौन है ?  पेहेले कबी देका नय ? " नायर अंकल  विचारू लागले .  मी दचकलोच ! नंतर लक्षात आलं की ते  अँटीव्हायरस बद्दल नसून त्या बाईंबद्दल विचारत होते .
" मुझे भी नहीं पता अंकल ... "  
" सावंत का चेहरा सडनली  किल गया ... एकदम कुश हुआ वो , इसलिए पुछा ..."  नायर अंकलना पण लगेच त्यांच्या  वागण्यातला फरक जाणवला . मी काही बोलणार इटक्यात स्टेशनवरच्या उभ्या असलेल्या लोकांमधे गडबड सुरु झाली . आम्ही  पहिलं तर गाडी स्टेशनमधे शिरत होती . लोकल स्टेशनला लागण्याच्या आधीच प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी तिच्यावर हल्ला चढवला.   कुणी चालत्या गाडीत चढत होते…  कुणी उतरत होते .... कुणी धडपडत होते ...कुणी ओरडत होते.  युद्धजन्य परिस्थिती झाली  ...  हलकल्लोळ झाला एकदम ...! आम्ही त्या गोंधळात कधी सामील झालो ते आम्हाला ही कळले नाही . आत जाऊन पाहतो तर  आमची जागा  भडकमकर आणि भरतने पकडली होती  आणि आश्चर्य म्हणजे जिग्नेस सुद्धा डाऊन  करुन आला होता .  मी  जोराची धावपळ करत जागा पकडली . नायर अंकल सगळी गर्दी कमी झाल्यावर निवांत चढले.  मी त्यांना माझी बसायची जागा दिली .  सगळे आले पण सावंत कुठे  दिसेनात.  मी त्यांना डोअरच्या दिशेने शोधु लागलो . पण ते अद्याप ट्रेन मधे चढलेच नव्हते .
" शरद आज  आला नाही का ? त्याचा फोनपण लागत नाही .  " भरत मला विचारत होता .
" मला नाही दिसला रे ... " म्हणत मी खिडकीबाहेर  सावंतांना शोधु लागलो . पण मी जे पहात होतो  त्यावर आणि  माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास  बसेना .  ते लेडिज डब्याच्या दाराशी उभे होते , मघाच्या बाईंशी बोलत !! सावंत... आणि लेडीज डब्यापाशी ?  काय प्रकार आहे हा ?    गाडीचा हॉर्न वाजला . तसे ते धावत पळत आमच्या डब्यात शिरले.
" सावंत , जरा आरामात .... "  रवीने त्यांना टोमणा मारला. सावंत आमच्या बसायच्या जागेवर आले . मी त्यांच्याकडे आश्चर्याने पहात असताना त्यांनी डोळे मिचकावले. आणि माझ्या बाजूला येऊन व्हिडिओ कोचकडे तोंड करुन उभे राहिले .
"  आज सबसे ज्यादा  कुश   कोई होगा तो वो सावंत है ! " नायर अंकल मिश्किल  चेहरा करुन म्हणाले .
" क्या हुआ अंकल ?" भरत विचारू लागला .
" नया दोस्त मिला उनको ... इसीलिए बहुत कुश है ...। " नायर अंकल व्हिडिओ कोचकडे नजरेने खुणावत म्हणाले .
" आ ...ssss  सावंत ... लै भारी .... "  म्हणत भरत त्यांना चिडवायला लागला .
" ऐसा कुछ नहीं ...।  जुनी  ओळख आहे . बास बाकी काय नाय ... " सावंत म्हणाले .
"   सावंत ..... मजा आहे ....! " भडकमकर  म्हणाले .  
"  चलो , आज पार्टी... "  जिग्नेस
" सावंत , सही ना.... ,  छुपे रुस्तम निघाले…  " , भरत  म्हणाला .    आमचा ग्रुप म्हणजे  काही बोलायची सोय नाही. एखाद्यावर घसरले की घसरले !   समोरच्याला रडकुंडीला  आणतात  अगदी  ! सावंत मात्र   शांत उभे राहिले.  थोड्या वेळाने मंडळी आपोआप दुसऱ्या विषयवार वळली .  ट्रेन कल्याणला पोहोचली आणि मी हळूच सावंतांच्या कानात म्हणालो , " सावंत ह्या त्याच बाई आहेत ना.... त्या दिवशीच्या  ?" तर त्यांनी पुन्हा डोळे मिचकावले . मला तर त्यांची गंमतच वाटली.
" सावंत , काय नाव आहे त्यांचं ? "  त्यांनी एकदा माझ्याकडे पहिलं . मी त्यांचं हे सीक्रेट कुठे फोडणार तर नाही ना  , याचा ते अंदाज घेत होते बहुतेक ... " मी नाही सांगणार कुणाला ... शप्पथ !! " त्यावर ते नुसतेच हसले .
"  जोशी .... शकुंतला   जोशी   "
" शकुंतला ....  वॉव ... मस्त नाव आहे . एकदम जुनं आणि भारी .   त्या शकुंतला ...  आणि तुम्ही कोण दुष्यंत ?? " मी गमतीने म्हणालो.
" अरे ए ... येडा बीडा आहेस काय ? काय पण जोड्या जुळवु नको. ती माझ्या शाळेत होती  तेव्हा आवडायची आणि त्याला आता जवळ जवळ   तीसेक वर्ष झाली आहेत .   आता तसं काही नाही ." ते पुरते गोंधळून गेल्यासारखे वाटत होते .

" त्यांच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच काहीतरी आहे . तसं काही नसतं  तर मग इतक्या वर्षांनी  तुमच्याशी बोलायला    कशाला आल्या असत्या  ?  " मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना लगेच काही उत्तर सुचलं नाही . त्यावर त्यांनी काहीतरी थातुर मातुर कारण दिलं जे त्यांनाही नीट पटवून देता आलं नाही . ते माझी नजर चुकवून मुद्दाम इकडे तिकडे पाहू लागले . मग मी त्यांना काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही  . जिग्नेस आणि भरत बरोबर भंकस करत उभा राहिलो . मी मधून मधून सावंतांकडे  त्यांना कळणार नाही अशा रीतीने पहात होतो . ते कोणत्या तरी गहन विचारात बुडालेले दिसत होते .  शाळेत , कॉलेजात असताना  मित्रांच एकच वाक्य   आपल्या आयुष्याची उल्थापालथ करु शकतं  , ते वाक्य म्हणजे ' ती तुझ्याकडे बघत होती '  आताही मी त्यांना विचारलेला प्रश्न सुद्धा त्याच धाटणीचा होता .   त्यांच्या मनात मागील काळाच्या आठवणी आणि चालू काळाची सध्याची परिस्थिती  यांचे मिश्रण सुरु  असल्यासारखं  वाटत होतं .  कधीकधी  मनात  अशा काही गोष्टी असतात त्या पुन्हा आठवून त्यावर विचार करण्यास मन सहसा  तयार नसतं . आपण त्या  गोष्टी   टाळत असतो . परंतु एखाद्या  तिर्हाईत व्यक्तिकडून  तीच  गोष्ट समोर आली की मनातल्या सुप्त  अवस्थेत असलेल्या निखाऱ्यांवरची राख उडते आणि मन नकळत पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करायला लागते . आपल्याही  नकळत  ! आजही  तसंच काहिसं झालं होतं ....
www.milindmahangade.blogspot.com

रविवार, १५ मार्च, २०१५

लोकल डायरी -- ५



   गाडी  सुटता सुटता एकजण धडपडत आत आला .  आधी तर आम्ही त्याला ओळखलंच नाही . तो शरद  होता …   आज तब्बल सात  दिवसांनी शरद लोकल मधे आला होता  आणि   तोही उशिरा …! त्याला बघुन तर आमच्या ग्रुपचा प्रत्येक मेंबर आश्चर्यचकित झाला .    कारणही तसंच होतं . वाढलेली दाढी , बिना इस्त्रीचा शर्ट  तोही इन न केलेला  , तारवटलेले डोळे ,  केस   विस्कटलेले  आणि मुख्य म्हणजे तो अगदी शांतपणे येऊन आपल्या जागी बसला . आल्या आल्या ना कुणाची भंकस  केली ना  कुणाशी  काही बोलला ....  खाली  मान घालून बसून राहिला . हे म्हणजे वाल्याकोळीचा  वाल्मीकी  झाल्यासारखं होतं . अनायसे  रामायण सीरियल मधल्या वाल्मिकींएवढी  नाही तरी लहानशी  दाढीही वाढवलेली होतीच …!    तो असा येऊन बसला , आमच्या कुणाला काय बोलवं तेच कळेना . शेवटी  सीनियर मेंबर सावंतच पुढे  झाले  
" काय रे शरद ? हे काय   ? आणि तू हे काय करुन घेतलस स्वतः चं ? "  
त्यावर तो काहीच बोलला नाही . नुसता मान खाली घालून  बसून राहिला . नायर अंकलही विचारू लागले पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही . तो डोळे बंद करुन स्वस्थपणे बसून राहिला . आज शरदचं नक्कीच काहीतरी बिनसलं होतं . सावंतांनी खुणेने भरतला ‘ काय झालंय  ? ‘ विचारलं . पण त्याने खांदे उडवले.  त्याला  काही  माहित नव्हतं . तोही आमच्यासारखा त्याच्याकडे  आश्चर्यने पहात होता.
" ए भाई , काय  झालाय काय तुला  ? गेले   पाच सहा   दिवस ट्रेनला आला पण नाहीस ... आणि आज हा असा अवतार का करुन घेतलायस् ?  घरी काय प्रॉब्लेम नाही ना ?  "  भरतने  त्याला विचारण्याचा प्रयत्न करुन पाहीला . तरी काही उत्तर नाही.  भरतला ते सहन झालं नाही . त्याने परत  त्याच्या दंडाला हलवुन विचारलं , तसा तो एकदम भडकला , " प्लीज मला काहीही विचारू नका .  मला  एकट्याला राहु दया  ....प्लीज !   "  तो असं बोलला आणि मग सगळेच शांत बसले . पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता , तो म्हणजे शरदचं हे असं का झालं ? " नायर अंकलने भरतला शांत रहा असं  खुणावलं . इतक्यात गाडी निघाली . उल्हासनगरला जिग्नेस चढला . तो  नेहमीप्रमाणे धड़पडत आला आणि  चुकून  शरदच्या  पायावर त्याचा पाय   पडला . शंकराने तिसरा डोळा उघडावा तसे त्याने आपले डोळे उघडले .
" अबे साले , दिखता नई क्या तेरेको ? "  म्हणत शरदने त्याला दुसरीकडे ढकलुन दिलं .
" शरद भाय ... यार ढकेलता क्यूँ है ? " स्वतःला सावरत जीग्नेस म्हणाला .
" तो क्या तेरेको सर पे बिठाऊँ ? " शरद भडकुन म्हणाला .  जिग्नेसलाही त्याच्या वागण्यातला फरक जाणवला . त्याने मला नजरेने  विचारलं . मीही त्याला नजरेनेच शांत रहा असं खुणावलं.
“ शरद यार , काय झालंय  ?  काय प्रॉब्लेम  असेल तर सांग  ना … आपण सॉल्व  करू  … ” मी शरदला म्हणालो .
“  प्लीsss ज …   ”  शरद अगदी हात वगैरे जोडून म्हणाला .  ‘ मला काहीही विचारू नका ‘ असाच त्या ‘ प्लीज ‘ चा अर्थ होता . शरदला  आणखी  विचारून  काही फायदा होणार नाही हे आता  आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला   कळलं होतं .  सगळे जण नेहमी प्रमाणे वागू लागले . शरद आमच्यात नाही असं समजून आमच्या गप्पा सुरु झाल्या .
" नायर अंकल ,  मेरा नया शूज देखिये ....। "  जिग्नेस म्हणाला
" अरे वा... सॉलिड है ... कहाँ से लिए ....? "
" यु एस ए "
" ओह .... मतलब  तेरे घर के बाजुसे   ना ? " सावंत भरतला टाळी देत म्हणाले .
" अरे नहीं ... सच्ची यु एस ए से ही लिए है .... मेरे अंकल है वहां पे । उन्होंने भेजे है । एक्चुली मेरे जिगरी   दोस्त को  दिखाना था लेकिन वो तो बोहोत भाव खा रहा है । " जिग्नेस शरदला टोमणा मारत म्हणाला . शरद मात्र समाधीच्या अवस्थेत गेलेल्या ऋषीसारखा  गंभीरपणे  डोळे मिटून बसला होता . परंतु त्याचे कान अर्थात आमच्या बोलण्याकडे आहेत असं  आम्हाला वाटत होतं  .
" वो क्या है न जिग्नेस , आज कल  कोई किसीका नहीं है ....।  सब अपनी अपनी सोचने मैं लगे रहेते है । " नायर अंकल सुद्धा  अप्रत्यक्षपणे  शरदलाच उद्देशून  बोलत होते .
" घोर कलियुग आलय बाबा... " भडकमकर मधेच म्हणाले . ते कधी काय बोलतील याचा नेम नाही.  त्यानंतर जीग्नेसने आपला  मोबाईल  काढला आणि त्यावर कोणत्या तरी डान्सचा  व्हिडीओ पाहत उभा राहिला . मीही  त्यात डोकं घालून पाहू लागलो .
“ अरे , एवढं  काय पाहताय ? आम्हाला पण दाखवा …   ”  सावंत विचारु  लागले  . जीग्नेसने त्यांना  आपला मोबाईल  दिला . “ ह्याच्या पायाला मुंग्या  चावल्यासारखा  पाय झाडत का नाचतोय हा  ? ” सावंत गमतीने म्हणाले . त्यावर सगळे हसले ,  शरद सोडून !
“ अरे  नही  उसको  Tap  डान्स  बोलते है  … धूम ३ में अमीर खान ने नै किया था ?  ”
“ अब तू ये नये शूज पेहेन्के  Tap  डान्स  करके दिखा … ” भरत म्हणाला .
“ नही  बाबा … अगर फिरसे  किसीके  पैरोपे  पांव  गिरे तो भगवान शंकर अपनी तिसरी  आंख  खोलेंगे … ”  जीग्नेसने   शरदकडे  एक चोरटा  कटाक्ष टाकला .  अशी सगळी मजा  मस्ती चालू होती पण त्यात नेहमीचा सहजपणा नव्हता .  आपल्या एखाद्या अवयवाला जर दुखापत झाली असेल तर  जसं  आपलं  लक्ष सारखं  सारखं  त्याच अवयवाकडे  जातं  त्याप्रमाणे आज आमचं  झालं  होतं  . आम्ही  अधून मधून शरदकडे  पाहायचो  पण त्याचे डोळे मिटलेलेच राहिले .  आज  व्हिडीओ कोच कडे  कुणाचं  लक्षही  गेलं  नाही . ना कुणी त्याबद्दल काही बोलले …  नेहमी विंडोत  झोपणारे भडकमकरही  आज जागे राहिले . हा तर रेकॉर्डच झाला आज ! पारसिकचा बोगदा लागला आणि डोअर वरच्या रवीच्या ग्रुपने ‘ जय  भवानी … जय अंबे … ‘  चा जयघोष सुरु केला .  आमच्या  जागा अदलाबदली  करणं  सुरु झालं  . सावंत , भरत  उभे  राहिले . मी आणि जीग्नेस त्यांच्या जागेवर बसलो . शरद  तसाच डोळे मिटून बसून राहिला . त्याला त्याच्या जागेवरून उठवण्याची रिस्क कोण  घेईल ?  आम्ही त्या भानगडीत पडलोच नाही .  ठाणे गेलं  , शरद  आपल्या जागेवरून उठला आणि डोअरच्या दिशेने जाऊ लागला .  
“ आयला , असा काय हा ? न सांगताच गेला !  सावंत,  जाम मोठा लोचा झालाय बहुतेक … ” भरत  त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला . शरद-  भरत  दोघे नेहमी घाटकोपर गेलं  कि मग बरोबरच गोंधळ घालत निघतात आणि कुर्ल्याला उतरतात . पण आज असं  झालं  नाही . तो भरतला न सांगताच पुढे गेला . तेही सर्वांना खटकलं  .
“ हो रे… बघ ,  कुर्ल्याला उतरल्यावर तरी काय बोलतो का ? तुला सांगेल कदाचित … ” मी  भरतला म्हणलो.  

कुर्ला आलं . तुडुंब भरलेल्या  धरणाच्या  लहानशा दरवाज्यातून पाणी सोडावं  तसे लोक धडाधड  त्या दरवाज्यातून बाहेर पडले .  आणि तितकेच पुन्हा आत आले .  आम्ही खिडकीतून बाहेर पाहू लागलो ,    भरतला  न भेटताच शरद निघून गेला होता .

रविवार, ८ मार्च, २०१५

लोकल डायरी -- ४

                                                                         
नमस्कार मित्रांनो …!!
बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहितोयकाही दिवसांपूर्वी  लोकल डायरी  ही  मालिका  लिहित होतो , पण काही कारणामुळे ती अर्धवट राहिली  .  लोकल डायरी  अर्धवट सोडल्याबद्दल क्षमस्व …. !  ह्या डायरीचे तीन भाग पूर्वी प्रकाशित केले होते पण आता  त्याला बरेच दिवस झाले . त्यासाठी ते तीनही भाग सोबत जोडत आहे …  

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html     लोकल डायरी २

http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html   लोकल डायरी ३

  आणि आता  पुढचा भाग लिहितोय


                                                                  लोकल  डायरी --  ४

                                  आमचा लोकलचा ग्रुप हा इतर ग्रुप पेक्षा एकदम  भारी आणि यूनिक आहे असं काही माझं म्हणण नाही . आमची फक्त एकमेकांना सवय झालीय एवढंच ! मनुष्याचा स्वभावच असतो तसा ... तो जास्तीत जास्त आहे त्या परिस्थितीत तसाच राहण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत त्याला स्वतःला काही त्रास होत नाही….  आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर येण्याचा प्रयत्न शक्यतो कुणी करत नाही. आमचा ग्रुपही त्याला अपवाद नव्हता . एवढंच काय , आमच्या बसायच्या जागेत दूसरा कोणी आला तरी आम्हाला  कसतरीच   वाटायचं ... आणि आमच्या पैकी सुद्धा कोणी दुसरीकडे जाऊन बसला तर त्यालाही अगदी दुसऱ्या ग्रहावर आल्यासारखं वाटत असावं . भड़कमकर विंडोत दिसले नाहीत , नायर अंकल नसले , सावंतांनी पेपर वाचायला आणले नाहीत  किंवा शरद भरत विडिओ कोच कड़े पाठ करुन उभे राहिले किंवा जिग्नेस ने काही बावळटपणा केला नाही तर चुकल्या चुकल्या होतं . प्रत्येकाची  वेगळी अशी एक खासियत आहे. प्रत्येकाला त्याच्या एका विशिष्ठ स्थितीत पाहण्याची सवय झाली आहे . आणि माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे अँटीव्हायरस  !!!  अजूनही मला तिचं  नाव कळलेलं  नाही त्यामुळे मी तिला  अँटीव्हायरसच म्हणतो …  ती दिसली नाही तर संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो . ती आली की सगळं वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. संजीवनीच जणू !!! एखाद्या व्यक्तीच्या येण्याने इतका फरक कसा काय पडावा ? कदाचित माझ्या नजरेलाही तिची सवय  झाली असावी .  पण आज काल ती ट्रेन ला दिसत नाही . किती दिवस ती मला दिसली नाही .... ?  हां... आजचा धरून नऊ  दिवस झाले . मी दिवस मोजतोय ह्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच !  नजर सारखी व्हिडिओ कोच कडे वळते. स्टेशन वर आल्यापासून माझे डोळे सतत तिलाच शोधत असतात. कानात इअर फोन घालून ती डब्यात दरवाज्यापाशी उभी आहे असा सारखा मला भास होतो  . मी तिकडेच बघत असताना ,  रादर तिलाच शोधत असताना  माझ्या पाठीवर एक जोराची थाप पडली. मी दचकुन पहिलं तर मागे भरत उभा होता.
" काय रे ... काय चाललय ? " त्याच्या विचारण्यात मिश्किलपणाची झाक होती .
" काय नाय रे ... पोरी बघत होतो ... दुसरं काय करणार ? " त्याला अपेक्षित असलेलं  उत्तर मी   देऊन टाकलं, त्यामुळे त्यालाही संशय घेण्यासारखं काही वाटलं नसावं . तोही मला मजेत टाळी देत म्हणाला , " हो बाबा,  हे मात्र महत्वाचं काम आहे ."
मग आम्ही इकडे तिकडे बघत बसलो.   शरद आला नव्हता.  त्यामुळे भरत आज माझ्याशी गप्पा मारत होता . एरवी ते दोघे इतरांची खेचत असतात . एकाने सुरूवात केली की दुसरा सुरू होतोच  . पण आज त्याचा उजवा हात नसल्यासारखं त्याला वाटंत असावं . आणि टाईमपास करायला दुसरा कोणी नसल्याने तो माझ्याशी बोलु लागला .
" काय रे ? तुझा भाऊ कुठं आहे ? " , सावंतानी  भरतला  विचारलंच !
" आज येणार नाही तो ...." भरत व्हिडिओ कोच कडे नजर टाकत म्हणाला .
" किधर गया है ? " नायर अंकल विचारू लागले .
" मालूम  नही…  "
" अरे , तेरा दोस्त है और तेरेकोही  मालूम नही ? "
" दोस्त है अंकल , बिबी थोडी है ? " त्याच्या हया उत्तरावर सगळे हसले . उल्हासनगरला जिग्नेसही चढला नाही.
" अरे , जीग्नेस भी नही आया …. बघा दोघे कुठे गेले नाहीत ना ? " सावंत गमतीने म्हणाले . आज दोन महत्वाची माणसं नव्हती , एक खिल्ली उडवणारा आणि दुसरा खिल्ली उडवुन घेणारा .... त्यामुळे डब्यात शांतता होती . मलाही आज कंटाळा आला होता . पलीकडे अँटीव्हायरस नसल्याने आणखीनच बोअर होत होतं. लोकलने कल्याण सोडलं आणि भड़कमकरांची गाडी घाटाला लागली . ते ट्रेन जशी हालेल तसे नागोबासारखे डोलत होते. सावंत पेपर वाचत बसले . नायर अंकलचं मात्र दोन्हीही चालू होतं. ते पेपरही वाचत होते आणि  मधून मधून  डुलक्याही काढत होते. आमच्या बसायच्या जागेवर एक कुटुंब आल्याने मी अणि भरतने त्यांना बसायला जागा दिली आणि आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या आवडत्या कामाला लागलो . मी बघत असताना भरत माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला ," ती ग्रीन ड्रेस वाली मुलगी आहे ना… ”
" कुठे रे ? " मीही त्याच हळू आवाजात विचारलं .
" अरे ती बघ ना समोर,  डोअरपासून तिसरी.... "
" हां…  हां… . पण तिचं काय ? "
" ती आता ठाण्याला उतरून एका आशिष नावाच्या मुलाला भेटणार आहे ." भरत अतिशय आत्मविश्वासने बोलत होता .
" तुझ्या ओळखीची आहे का ती ? "
" माझी कसली डोंबलाची ओळख !! मी तिला फोन वर बोलताना पहिलं "
" तुला एवढ्या गोंधळात कसं काय ऐकायला आलं ? " इतक्या अचूकपणे त्याने हे सांगितल्यामुळे मला जरा आश्चर्यच वाटलं.
" अरे ऐकायला कसं येईल ? मी तिचे लिप्स रीड केले. तिच्या ओठांच्या हालचालीवरुन मी हे सांगू शकतो ." भरतने दिलेल्या ह्या स्पष्टीकरणावर तर मी त्याच्याकडे पहातच राहिलो .
" आयला... पोरी पटवण्यासाठी माणसं काय काय करतात ... धन्य आहे ... " मी त्याच्याकडे अविश्वासने पाहू लागलो.
" पोरी पटवण्यासाठी नाही रे बाबा ... माझा चुलत भाऊ बहिरा आणि मुका आहे . त्यामुळे आम्हाला त्याच्याशी बोलताना असंच खाणाखुणा करुन आणि ओठांच्या हालचाली वरुन बोलावं लागतं. मीही ती लिप रीडिंग शिकलो आणि  त्यामुळे मला ती सवयच लागली आहे . कोणी लांब जरी बोलत असेल अणि फक्त लिप रीडिंग करुन मी सांगू शकतो की तो माणूस काय बोलतोय ते ..."
" आयला भारीच की आहे हे !!!  बर चल सांग त्या निळ्या साडी वाल्या काकू काय बोलतायत शेजारच्या काकुंशी ? "
" कोणत्या ? ओह  त्या का ... ?  थांब , मला थोडा वेळ निरिक्षण करू दे ...." म्हणत भरत त्या कामाला  लागलाही ! तो डोळे बारीक करुन एकटक त्या निळ्या साडीवाल्या बाईँकडे पाहू लागला.
" अरे ए ... एवढं एकटक बघू नकोस ... त्या बाईंना काहीतरी वेगळाच संशय यायचा... मार खाशील फुकटचा ! "
" गप रे काय होत नाही.... " तो तसाच नजर न हटवता म्हणाला . असंच अजुन 3 -4 मिनिटे एकटक पाहिल्यावर तो म्हणाला , " ती तिच्या ऑफिस मधल्या एक बाई बद्दल बोलत आहे आणि ती तिची सीनियर असावी "
" कशावरून ? "
" ती म्हणत होती की, " त्या सटवीचं प्रोमोशन काय झालं स्वतःला फार शहाणी समजायला लागलीय... "
" काय ... ?  असं म्हणाल्या त्या बाई ? " मला मोठी गंमतच वाटली.
" हो ... मी माझ्या डोळ्यांनी ऐकलय ...."  म्हणत तो मिश्किल पणे हसु लागला .
"  मस्तच रे ... मानला यार तुला .... कडक !!! पण मला अजुनही जरा शंका वाटतेय ..."
" आयला , आता एवढं तुला प्रात्यक्षिक करुन  दाखवलं तरी तुझा विश्वास नाही ? "
" आता मला काय माहित की त्या बाई खरंच असं बोलत असतील ते ? तू सांगितलस म्हणून मी आपलं हो म्हणतोय ... "
" आई शप्पत ..... भरत ला चॅलेंज  !   ” मी नकळत   भरतचा  स्वाभिमान   दुखावला   होता  .
" नाय रे बाबा ... तुला कशाला चॅलेंज देऊ  ? " मी आपलं सावरण्याचा प्रयत्न करु लागलो .
" नाय .... नाय .... तुझा विश्वास बसत नाही ना ? चल ...  तू आवाज न करता फक्त ओठांची हालचाल करुन एखादा शब्द बोल .... मी तो ओळखतो ..."
" अरे जाउ दे रे बाबा ... "
" नाय ... आपल्यावर  अविश्वास ? बोल बोललो ना आवाज न काढता  एक शब्द ." भरत एकदम इरेलाच पेटला...
भरत आता मला तसं सोडणार नव्हता , हे माझ्या लक्षात आलं . आता त्याला कोणता तरी  शब्द द्यावा लागणार होताच . कोणता शब्द द्यावा ? मी मनात विचार करू लागलो . आता शब्द दिला तर जरासा अवघडच द्यावा , म्हणजे जिरेल जरा त्याची असा विचार करुन मी एक शब्द ठरवला. भरत माझ्याकडे लहान मुलाच्या कुतुहलाने पहात होता.  त्याचं तसं ते तोंड बघुन तर मला हसायला यायला लागलं .
" हसतोस काय साल्या .... बोल ना आता ... "
" ओके ... ओके... ऐक .... सॉरी... बघ...." म्हणत मी मनात ठरवलेला शब्द आवाज न काढता नुसत्या ओठांच्या हालचालीवरुन बोलून दाखवला ....तो माझ्याकडे  निरखून पाहू लागला . अन म्हणाला , “ सोप्पय  … ”
“  सांग  ना मग,   मी काय बोललो ते  !  ”
 त्याने जे उत्तर दिलं त्यावर माझी बोलतीच बंद झाली .
तो म्हणाला  -  " अँटी व्हायरस ! "

                                                                

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

फटाके


                फटाक्यांची लांबलचक माळ त्याने जमिनीवर पसरवली.  त्याच्या एका हातात पेटवलेली अगरबत्ती होती. त्यातुन निघणारा धुर नागमोडी वळणे घेत वर जाऊन हवेत कुठेतरी  अदृश्य होत होता.   त्याचबरोबर त्यातुन मोगऱ्याचा मंद सुगंध फटाक्यांच्या दारुच्या वासात मिसळत होता.  फटाक्यांच्या  त्या माळेला पेटती अगरबत्ती लावण्यापुर्वी आठवणीने त्याने तिची वात खुडली.   मागच्या अनुभवावरुन तो हे शिकला होता.  पुर्वी  एका फटाक्याची वात न खुडताच त्याने तो पेटवला आणि  त्या  क्रूर  फटाक्याने त्याला हलायला पुरेसा वेऴही दिला नव्हता.               ' ढाम्म....  ' त्याच्या कानाच्या  बाजुलाच तो फुटला.  बराच वेळ त्या कानाने त्याला काही ऐकु येत नव्हते.  परंतु आता त्याने ती खबरदारी घेतली होती.  सावकाशपणे तो खाली वाकला.  पेटती अगरबत्ती त्या खुडलेल्या वातीच्या जवळ आणली.  हावरटपणे त्या वातीने अगरबत्तीची ती आग आपल्याकडे ओढली .... सुरसुर  पेटत ती फटाक्याच्या दिशेने वेगाने जाऊ लागली.  तो चलाखीने बाजुला झाला  आणि तडातड फटाक्यांची माळ वाजली .....                         

                   फटाक्यांच्या त्या आवाजाने संजू  झोपेतुन जागा झाला.  त्याला स्वप्न पडलं होतं.  आज दिवाळीची पहीली पहाट होती.  कालपर्यंत उत्साहात असणारा  संजू  आज मात्र जरासा निराश होता.  निराशेपेक्षा त्याला  राग जास्त  आला होता. तो तसाच अंथरुणात पडुन होता.  आज आपण उठायचंच नाही असं मनाशी ठरवुन तो तोंडावर चादर घेऊन तसाच पडुन राहीला.  
" संजू ,  उठ बाळा ,  आज दिवाळीचा पहीला दिवस आहे.  " पणत्या पेटवता पेटवता आई त्याला हाक मारत होती .  त्याने चादरीच्या कोपऱ्यातुन पाहीलं,  बाबा गॅलरीत आकाशकंदिल लावत होते.  आकाशकंदिल लावुन झाला,  त्यातल्या बल्बचे बटन दाबले अन् लाल - पिवळा प्रकाश सर्वत्र पसरला.  त्यासरशी संजू   अंथरुणातुन उठला.  काही वेळापुर्वी केलेला निश्चय तो साफ विसरला होता .   आकाशकंदिलाच्या प्रकाशातच काहीतरी जादू असावी.  पहीली अंघोळ मस्तपैकी सुगंधी उटणे लावुन , उरकुन तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला.  बाबा सकाळचा पेपर वाचत बसले होते.  
" बाबा, फटाके .... " त्याने सुर लावला.  आधी तर त्यांचं लक्षच गेलं नाही.  ते तसेच पेपर वाचत बसले.  
" बा  बा..... फ  टा  के...... " ह्यावेळी आणखी मोठ्याने सुर लावला.  बाबांनी त्याच्याकडे पाहीलं.
" हं...  आज संध्याकाळी आणुया . " एवढं बोलुन त्यांनी परत पेपरमधे डोकं घातलं.  तेवढ्याने संजूचं समाधान झालं आणि तो खेळायला पळाला.  
       "  माझ्या बाबांनी काल मला खुप फटाके आणले.  चल तुला दाखवतो.  " संजूचा मित्र अभि त्याला म्हणाला.  दोघेही त्याच्या घरी गेले.  दोन मोठे बॉक्स भरुन अभिच्या  घरी फटाके आणले होते ... पाऊस,  भुईचक्र, फुलबाज्या,  रॉकेट.,  लवंगीच्या माळा,  नागाची गोळी,  टिकल्या,  बंदुक.... सुट्टे फटाके असे बरेच  प्रकार पाहुन संजूचे डोळे चमकले.  प्रत्येक प्रकार हातात घेउन तो कुतुहलाने पाहु लागला.
" तुला माहितीये  ? हा ना,  आकाशात जाऊन सात वेळा फुटतो ... ” एका मोठ्या फटाक्याकडे बोट दाखवुन अभि त्याला म्हणाला.  संजू   डोळे विस्फारुन ते पहात होता.  
" हा ..?  "  एका वेगळ्याच फटाक्याकडे पहात संजूने  विचारलं.
“ हा ?   हा  कलरवाला रॉकेट  आहे  ”
“  आणि  हा  ? ”
" हा ...?  मला पण माहीत नाई .  माझे काका अमेरीकेत असतात ना,  त्यांनी पाठवलाय .  आज संध्याकाळी बाबा आले की आम्ही हे फटाके फोडणार ... " अभि  भलताच खुशीत येउन ते सांगत होता .  संजू  त्याच्याकडे असुयेने पाहु लागला.  आपले पण कोणी काका अमेरीकेत असते तर किती बरं झालं असतं ?  असा एक निरर्थक विचार त्याच्या मनात चमकुन गेला.  ते दोघे समोर मांडलेले फटाके बघत असताना ,
" अभि,  सगळा पसारा काढुन बसु नकोस.  संध्याकाळी काढ ते ... आता ठेव.  मार खाशील नाईतर .... "  आतुन अभिच्या आईचा ओरडण्याचा आवाज आला . अभि घाईघाईने तो समोर मांडलेला पसारा आवरु लागला.  त्यात  संजूच्या हातात असलेलं भुईचक्र त्याने हिसकावुन घेतलं आणि पिशवीत टाकलं.  संजूचा हिरमोड झाला.  तो तसाच उठला अन् काहीश्या रागातच घरी आला.
" आई,  बाबा कधी येणार ?  "  तोंड वेंगाडून त्याने विचारलं .
" संध्याकाळी येतील .... " करंज्यामधे सारण भरता भरता आई त्याला म्हणाली.  
" आज मला  फटाके पाहीजेत.  माझ्या सगळ्या मित्रांकडे बघ किती  फटाके आहेत , आणि माझ्याकडेच काही नाही ... मला फटाके पाहीजेत.  " त्याने हट्टच धरला.  
" हो.... हो…  बाबा आणणार आहेत हा  आज फटाके तुला.…  " त्याची समजूत काढून  आई आपल्या दिवाळीच्या फराळाच्या कामाला लागली.  संजू कसनुसं तोंड करुन पुन्हा बाहेर आला. आता संध्याकाळपर्यंत काय करायचं ...?  काहीच टाईमपास नाही. फटाके असले असते तर,  निदान ते बघण्यात वेळ गेला असता.  पाच दिवसात रोज किती किती फटाके  वाजवायचे  त्याची वर्गवारी करता आली असती. आपण पण  मित्रांना आपल्याकडचे फटाके  दाखवले असते .  पण छे ...!   वैतागुन त्याने टिव्ही लावला.   समोर एका फिल्म मधलं फटाके फुटण्याचा सीन चालु होता.  त्याने चॅनल बदलला. ,  पुढच्या न्युज चॅनलवरचा रिपोर्टर फटाक्यांच्या दुकानासमोर उभा राहुन मार्केट मधे कोणकोणते नवनवीन फटाके आले आहेत त्याची माहीती देत होता.  त्याने पुन्हा रागाने चॅनल बदलला.  पुढच्या चॅनलवर कुठेतरी फटाक्यांच्या फॅक्टरीला आग लागल्याचा व्हीडीओ चालु होता.  ते पाहुन तर संजूच्या तळपायाची आग मस्तकात गेली.  त्याने रागाने टिव्ही बंद केला आणि रिमोट सोफ्यावर फेकला. घड्याळात पाहिलं ,  संध्याकाळ व्हायला अजून पाच - सहा तास होते .  बाबा कधी येणार  ? आणि त्यांनी  आठवणीने  फटाके  आणले तर बरं  ! विचारांचा भुंगा त्याच्या डोक्यात फिरू लागला . वैतागून तो  गॅलरीत जाऊन उभा राहीला.  पलीकडच्या झोपडपट्टीतली त्याच्या वयाची लहान लहान पोरं  सुट्टे लवंगी फटाके वाजवत होती.  संजू  ते पहाण्यांत दंग झाला.  ती मुलं फटाक्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करत होती.  कधी ते फटाक्यावर धुळ मातीचा ढिगारा टाकुन तो पेटवत,  फटाका फुटला की  फिल्म मधे दाखवतात तसा बॉम्ब फुटल्याचा भास होत होता. धुळीचा लहानसा ढग तयार होत होता आणि  लगेच विरतही होता.  ते दिसायला अतिशय गमतीदार दिसत होतं.  ,  कधी  कधी ती मुले दोन - तीन सुट्ट्या फटाक्यांच्या वाती एकमेकांवर पिळुन एकत्र फोडत होते.  त्यामुळे एकाच वेळी दोन तीन फटाक्यांचे आवाज येत, असे वेगवेगळे प्रयोग केल्यावर त्यांच्याकडचे सगळे फटाके संपले.  मग कुणीतरी टिकल्यांची बंदुक आणली  आणि त्यांचा चोर पोलिसचा खेळ सुरु झाला.  दोन गट पडले.  ते एकमेकांना लपत छपत  टिकल्यांच्या बंदुकांनी गोळ्या मारत होते,  थोड्या वेळाने त्यांना त्याचाही कंटाळा आला.  मग ती मुलं  न फुटलेले फटाके  शोधत फिरू लागली .  त्यातली दारू काढून  ती पेटवण्याचा खेळ सुरु झाला . तेही मजेदार होतं .  तो पहात असताना आतून आईची हाक  ऐकू आली .
“  ह्या कारंजा बघ कशा  झाल्यात   ? ”  आईने  बशीत कारंजा दिल्या .  त्याने कशीबशी एक करंजी  खाल्ली .  खरं  तर करंज्या म्हणजे त्याचा आवडीच्या  ! पण त्याला आज त्या गोड लागेनात .  इतक्यात खालून  कॉलनीतल्या पोरांचा आवाज आला .  त्याचे मित्र विकी , मन्या  , अभि  त्याला बोलावत होते . त्यांनी भरपूर दगड आणि माती आणली होती . किल्ला करण्यासाठी  .  त्यांची दुपार किल्ला बनवण्यात गेली . किल्ल्याला  नागमोडी  पायऱ्या , मध्ये मध्ये वाघ सिंहांच्या गुहा केलेल्या , जागोजागी  मावळ्यांचा खडा पहारा  उभा केला . हत्ती , घोडे उभे केले.   किल्ल्याच्या  पायथ्याला हिरवीगार शेती केली.  त्यात सलाईनचं  कारंजं उभं  केलं  .  किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी शिवाजी महाराजांची रेखीव मूर्ती स्थापन केली आणि किल्ल्याला  वेगळंच तेज प्राप्त झालं  . तोपर्यंत  फटाक्यांच तर संजू  साफ विसरून गेला . तो  गेरूने  किल्ला रंगवण्यात  गढून गेला होता. पण मधेच  मन्याने  विचारलं , “ दिवाळी झाल्यावर ह्या किल्ल्याचं  काय करायचं ?  ”  
“  काय करायचं  म्हणजे  ?  ह्या गुहेत   ना  एक मोठा फटाका  लावून  फोडायचा … ” कोणीतरी म्हणालं .
“  ए  नाय रे …. आपला किल्ला  फोडायचा नाही  … ”  पोरांची भंकस  सुरु झाली . त्यात फटाक्यांचं  नाव निघालं  आणि इतका वेळ  विस्मरणात गेलेला  फटाक्यांचा भुंगा   पुन्हा संजूच्या  डोक्यात शिरला .   संध्याकाळ झाली होती .  सगळी मुलं  तयार व्हायला  आपापल्या घरी गेली . संजूही  गेला .  
“  आई , बाबा कधी येणार  ? ”  त्याचा परत तोच प्रश्न  .
“ येतील रे… जर धीर धर … आणि हा काय अवतार केलायस  ? जा तोंड हात पाय धु … जा लवकर . ”
संजू  पाय ओढत ओढत बाथरूम मध्ये गेला .  नंतर सगळं  आवरून पुन्हा बाबांच्या वाटेला डोळे लावून बसला . आता केव्हाही बाबा येतील आणि त्यांनी  फटाके  आणले असतील , मग कित्ती  मज्जा  !!!  संजू   मनातल्या मनात विचार करू लागला .  त्याला पुन्हा खालून अभिचा आवाज आला .  त्याच्या बरोबर त्याचे बाबा होते त्यांच्या हातात एक मोठी पिशवी होती .
“ खाली ये ना .… आम्ही फटाके  फोडतोय … “  अभि  बोलावत होता . त्याचे बाकीचे मित्रही  फटाके  फोडायला  खाली  जमा झाले . आधी तर संजूला खाली  जाउच नये असं वाटत होतं . बाकीचे  फटाके  फोडणार आणि आपण नुसतं  बघत बसायचं  ?  हे  म्हणजे  आपल्याला भूक लागली असून  सुद्धा आपण  स्वतः  न जेवता दुसऱ्या एखाद्या  जेवणाऱ्या माणसाला फक्त बघण्यासारखं  आहे ….   पण आईच म्हणाली कि तो एवढं  बोलावतोय तर जा … म्हणून तो नाईलाजाने खाली गेला . अभि  आणि त्याच्या बाबांनी भरपूर फटाके  आणले होते . अभिने  पाउस लावला , वर उंच  जाणारा पावसाच्या   प्रकाशात  त्याचे डोळे दिपले  .  भुईचक्र एखाद्या चक्रम माणसासारखे  वाट फुटेल तिकडे  पळत होते . लवंगी स्वतःच्याच तोऱ्यात  असल्यासारख्या तडतडत होत्या .  फुलबाज्यातून उडणाऱ्या चांदण्या वर उडून खाली जात होत्या . अभि  आणि बाकीचे सगळे आनंदाने ओरडत होते .   संजू  फक्त ती आतिषबाजी लांब उभा राहून पहात होता . सगळ्यांचे  फटाके  संपले आणि  ते  जायला निघाले . आता संजू  एकटाच उरला होता . त्याची नजर गेट कडे लागली होती . अजूनही त्याचे बाबा आले नव्हते . शेवटी कंटाळून  तोही परत फिरणार इतक्यात त्याला एका कोपऱ्यात  लवंगी फटाक्यांच्या  २-३  माळा  पडलेल्या दिसल्या . मघाशी अभिच्या पिशवीतून त्या पडलेल्या असाव्यात , त्याने विचार केला . आपण त्या घेऊया का ? अशाही त्या तशाच  पडलेल्या आहेत . आणि आजूबाजूला दुसरा कोणीही नाही . त्या लवंगीच्या  माळा  आपण घेतल्या  तर काय फरक पडणार आहे ? त्या  माळा  त्याला खुणावत होत्या . त्याचं  एक मन त्या फटाक्यांकडे  धावत होतं  तर दुसरं  मन ते करण्यापासून त्याला परावृत्त करत होतं  .  दुसऱ्याचे  पडलेले फटाके  कसे घ्यायचे  ? बाबा ओरडतील .  पण आज  बाबांनी फटाके  आणले नाही तर ? शेवटी त्याच्या एका मनाने दुसऱ्यावर  विजय मिळवला .  संजू  त्या माळांच्या दिशेने  जाऊ लागला . तो त्या माळांना  हात लावणार इतक्यात  बिल्डींगच्या  गेटचं  लोखंडी दार वाजलं .  गेटमधून त्याचे बाबा आत येताना त्याला दिसले . त्याने पाहिलं  बाबांच्या हातात दोन मोठ्ठ्या  पिशव्या होत्या …  



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

अंबिका


 अंबिका व्यायामशाळेच्या मैदानात संध्याकाळी पोरं प्रॅक्टीस साठी जमली होती. कुणी कामावरुन आलं होतं,  कुणी कॉलेजमधुन,  तर कुणी असंच वेळ जात नाही म्हणुन . प्रॅक्टीस सुरु झाली. दिल्या, सत्या, बाळ्या,  विक्या आणि असेच बरेच जण प्रॅक्टीस करण्यात गढुन गेले होते.  बराच वेळ झाल्यानंतर सुन्या धावत धावत आला.  
" साल्या,  ही वेळ आहे काय रे यायची ?, पोरींच्या मागे जरा कमी फिरत जा... " दिल्यानेे त्याला चिडवलं
" अबे नाय यार... कॉलेजला जरा काम होतं "
" कसलं काम असतं रे तुझं कॉलेजला ? साला बघावं तेवा पोरीच फिरवत असतो...  " दुसरं कोणीतरी बोलंलं.
" नाय रे ... आईशप्पत … !  " सुन्या  खरोखरंच सांगायचा प्रयत्न करत होता पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. अशी काहीतरी भंकस चालु झाली आणि त्याचा फायदा घेऊन बाकीचेही प्रॅक्टीस सोडुन टाईमपास करायला लागले. सुन्या आला आणि होती नव्हती तेवढी प्रॅक्टीसही बंद पडली.  सगळे कोडाळं करुन मैदानात बसुन गप्पा मारायला लागले. एकमेकांची खेचणे,  शिव्या घालणे,  पांचट जोक मारणे अशी मस्ती चालु असतानाच विक्याने सगळ्यांना शांत केलं.  सगळेजण तो बघत असलेल्या दिशेने पाहु लागले. लाईट गेल्यावर चालु असलेला टिव्ही खट्कन बंद पडावा तशी सगळ्यांची मजामस्ती एका झटक्यात थांबली.  समोर बघतायत त्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. समोरच्या गेटमधुन मोहन चालत आत येत होता. तो आला आणि मुख्याध्यापक वर्गात आल्यावर जसेे विद्यार्थी एकसाथ उभे राहतात तसे सगळे उभे राहीले.  प्रत्येक जण त्याच्याकडे भितीयुक्त आदराने पहात होता. बराच वेळ कुणाला काय बोलावं ते सुचलंच नाही.  सगळे त्याच्याकडे पाहत उभे राहीले.  शेवटी तोच म्हणाला,  " कायरे ?  प्रॅक्टीस का थांबवलीत ?  " तो इतका सहजपणे बोलला की जणु काही झालंच नाही.  पोरांना काय बोलावं तेच कळेना.  पोरांच्या अशा वागण्याला कारणही तसंच होतं. मोहन गेली दोन वर्षे अंबिकेत फिरकला नव्हता. आणि तो पुन्हा कधी परत येईल असं कुणालाच वाटत नव्हतं. पण आज तो सर्वांच्या पुढे येऊन उभा राहीला होता. भुत पहावं तशी सगळी त्याच्याकडे पहात राहीली.
" अरे  भाई ,  काय झालाय काय ? असे काय बघताय माझ्याकडे ?  " मोहन   सगळ्यांकडे  बघत म्हणाला. पोरं एकमेकांकडे पाहु लागली. कुणालाच त्याच्याशी बोलायचं धाडस होईना.  तरी हिम्मत करुन सुन्या त्याला म्हणाला,  " मोहन,  यार तु कसा काय आलास प्रॅक्टीसला ?  "
" का ?  येऊ नको का ?  "
" अरे,  तसं नाही यार... तु तर जान आहेस आपल्या मंडळाची ...! ,  तुझ्यामुळे तर हे मंडळ तयार झालंय ,  खरं तर आम्हालाच समजत नव्हतं की तुला सामोरं कसं जायचं ? दोन वर्षापुर्वी जे घडलं ....   " सुन्या अडखळत म्हणाला.
" जे झालं ते झालं ... गोली मारो उसको ... आजपासुन मी पण येणार प्रॅक्टीसला.  येऊ ना ?  "  तो हसत म्हणाला.  
" बास काय भाई !  तु आलास ... आता आग लावुन टाकु भेंचोद....!  " सुन्याने मोहनला उचललं तसं पोरांनी एकच गलका केला .... कानठळ्या बसतील अशा शिट्ट्या वाजल्या ... काय झालं हे बघायला आजूबाजुचे लोक आपापल्या घरांतुन बाहेर आले ...
" ए भिकारचोट पक्या,  तुझा डिजे लाव मोठ्याने .... आपला भाई आलाय परत .... आता मारुन टाकु सगळ्या मंडळांची ...!  आता फक्त एकच नाव मुंबईभर गाजणार.... अंबिका...!  " त्यावर सगळ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.  
पक्याने पडत्या फळाची आज्ञा समजुन जोरात डिजे लावला ... सगळी पोरं नाचायला लागली ,  पोरांनी मोहनला खांद्यावर घेतला  अन् हंडीचा पहिला थर रचला गेला ...
             " कसली अवदसा परत आठवलीय तुम्हाला ?  डोकं फिरलंय काय ?  एवढं सगळं होऊन पुन्हा तेच !  "  लाटलेली चपाती भडभडत्या स्टोव्हवरच्या तव्यावर टाकुन फणकाऱ्याने मोहनची बायको त्याला बोलली.  तो मात्र शांतच राहीला.  समोर असलेल्या टिव्हीचे चॅनल बदलत बसला.  " काय म्हणतेय मी ...?  इतकं सगळं झालं तरी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो...?  माणसाचं काळीज  आहे की जनावराचं ?  " ती तशीच बराच वेळ बडबडत राहीली.  मोहन मात्र शांतपणे ऎकुन घेत होता. त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं आणि तिच्याकडे लक्ष न  देण्यासाठीच तो टिव्ही लावुन बसला होता. बाजुला त्याची सात वर्षाची मुलगी बसली होती. " मी इतकी जीव तोडुन सांगतेय आणि तुमचं लक्ष कुठंय हो ...?  आग लावा त्या तुमच्या टिव्हीला ...! " तिचं तणतणंन चालुच होतं. चॅनल बदलता बदलता मोहन एका न्युज चॅनलवर येऊन थांबला.  त्यावरची न्युजरिपोर्टर दहीहंडीची तयारी कशाप्रकारे चालली आहे ते दाखवत होती.
" मी तुम्हाला तिकडे जाऊ द्यायची नाही ... ऐकलंत का ?  " ती अक्षरशः ओरडुन म्हणाली.  मोहन तसाच उठला,  पायात चप्पल घातली आणि चालायला लागला.
" माझ्या पोराचा जीव घेतलाय ह्या अंबिकेने...."  ती कळवळुन रडु लागली.  पुढचं ऐकण्याआधी मोहन घरातुन केव्हाच बाहेर पडला होता.  
           मोहन अंबिकेत परत आल्यामुळे पोरांना चांगलाच जोश आला होता. सात वर्षापुर्वी त्यानेच सगळ्यांना एकत्र करुन अंबिका व्यायामशाळेची स्थापना केली  आणि तेव्हाच दहीहंडीचा चांगला ग्रुपही तयार झाला होता.  एक दोन वर्षातच आठ थर लावणाऱ्या अंबिकेचं नाव सगळ्या मुंबईभर झालं होतं.  पुढे  हंडीचं बाजारीकरण झालं आणि त्यातुनच सुरु झाली ती थरांची जीवघेणी स्पर्धा ...!  पुर्वी सहा - सात थर म्हणजे डोक्यावरुन पाणी ....!  पण उंचीची नशा काही वेगळीच असते.  आणि ह्या नशेतच मोहनने आपला मुलगा गमावला होता.  आठव्या थरावरुन पोरगं खाली कोसळलं ते थेट डोक्यावर पडलं. हॉस्पिटलला नेईपर्यंत उशीर झाला होता. ह्या घटनेला आता दोन वर्षे झाली होती . मोहनच्या  बायकोला त्याचा मोठा धक्का बसला.  सहा महिने ती त्या धक्क्यातुन सावरली नव्हती. परंतु वेळ ही प्रत्येक जखमावरचं औषध असते. हळुहळु ती मुळपदावर आली. परंतू परवा मोहन अंबिकेत गेला आणि पुन्हा ती बिथरली.  
   " ह्या वर्षी आपण रेकॉर्ड करायचा .... नऊ थरांचा ...!  " मोहन ने घोषणा करुन टाकली. पोरं त्याच्या तोंडाकडे बघतच राहीली. एवढं होऊनही ह्या माणसात केवढा उत्साह आहे?   " अरे,  बघताय काय ? चला प्रॅक्टीसला लागा... आपल्या पहील्या थरावर बाज्या  आणि बाकीचे पंधरा जण,  दुसऱ्यावर संजय आणि त्याच्या बरोबरचे दहा  जण ...."  मोहन ने प्रत्येक थराचा एका ग्रुप लिडर बनवला आणि त्याच्याबरोबर त्या ग्रुपला नेमुन दिले होते. शिवाय थरांच्या बाजुने कोण कोण उभं रहाणार ....,  वरच्या थरांवर चढायला मदत कोणकोण करणार ...,  खाली एखादा पडला तर झेलायला कोण असणार, याची सगळी आखणी झाली होती आणि त्याप्रमाणे प्रॅक्टीसही जोरात सुरु होती. वजनाने हलका आणि सडपातळ असल्याने  मोहन स्वतः सातव्या थरावर होता.  
जोरदार प्रॅक्टीसला चालू होती .  हा हा म्हणता दहीहंडी दोन दिवसावर आली.
" यार मोहन,  प्रॅक्टीस तर जोरात चालु आहे पण तु म्हणतोस तसं नऊ थर लावायचे असतील तर आपल्याला  तीन एक्क्यावर भागणार नाही.  काहीतरी वेगळं करायला पाहीजे .... " सुन्या काळजीच्या सुरात म्हणाला.  
" हम्म्... त्याचा विचार मी केलाय .... बघु कसं होतंय ते   "
" नायतर आपण आपले आठ थरच लावु .... काय बोल्तो ...?  "
" नाय.... थर लागले तर नऊच... नाय तर नाय... " मोहनच्या ह्या निर्धारापुढे सुन्याला काय बोलावं ते कळेना.  त्याच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नव्हतं. राहीलेले दोन दिवसही निघुन गेले आणि शेवटी तो दिवस आला.  सगळ्या पोरांच्या अंगात अंबिका व्यायामशाळेचे पिवळे टिशर्ट होते.  नेहमीप्रमाणे बापुशेटचा ट्रक पोरांनी खच्चुन भरलेला. ट्रकच्यामागच्या भागात पोत्यात कापुस भरावा सगळी पोरं  भरलेली ,  ट्रकच्या टपावर चाळीतव्या काही टवाळ पोरांनी आधीच जागा पटकावली होती. गाडीच्या  केबिन मधे लहान लहान पोरं-पोरी  बसली होती. मोहन आणि सुन्याही त्यातच बसले होते.   ट्रक निघतानाच पोरांनी जय अंबिकेचा जयघोष केला.  
" सुन्या मी थोडा बदल केलाय .... " मोहन त्याच्याकडे पहात म्हणाला. सुन्याच्या चेहऱ्यावर लहानसे प्रश्नचिन्ह उमटले " ऐक,आपण  आपल्या जागांची आदलाबदल करु.  मी तुझ्या जागी  आठव्या थरावर जातो.  "
" का रे?  काय झालं ...?  "
" नववा थर रचण्यासाठी .... " मोहनच्या डोळ्यात पक्का निर्धार दिसत होता.  सुन्या त्यावर काहीच बोलला नाही.  त्याला विचारुनही काही फायदा नव्हता.  थोड्याच वेळात ते मानाच्या हंडीपाशी पोहोचले.  भला मोठा जनसागर लोटला होता.  एका मंडळाची सलामीची तयारी चालली होती.  त्यांचे दोन थर रचुन झाले होते. हळुहळु थर वाढत होते.  परंतु सातव्या थरापर्यंत ते गेले आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे कोसळले. कुठुनतरी  पाण्याचा  फवारा आला.  जोरजोरात डिजे सुरु झाला.  एकमेकांच्या अंगावर कोसळलेल्या पोरांना शक्या तितक्या जलद गतीने बाजुला खेचण्याचे काम काही लोक करत होते.  बाकीची मंडळे प्रतिक्षेत होती... अंबिका व्यायामशाळेचे गोविंदा पथक मानाच्या हंडीपाशी पोहोचले.  
                 आता सर्वजण गोल उभे राहीले.  मोहन विक्याच्या खांद्यावर बसला.  त्याच्या सुचना सगळे कान देऊन ऐकु लागले.  पहीला पायाचा थर गोल करुन उभा राहीला.  मोहनने पुढची शिट्टी वाजवली.  लगेचच दुसऱ्या थराची पोरं त्यांच्या खांद्यांवर जाऊन चढुन उभी राहीली.  असं करता करता पाच थरांचा पिरॅमिड उभा राहीला. आता  डिजे आपोआप बंद झाला.  लोंकांचं पाणी मारणं  बंद झांलं. सगळे एकटक त्यांच्याकडे पाहु लागले.  आता  एक्के लावले जाणार होते.  हळुहळु एक एक एक्का वर चडु लागला.  पहीला दिल्या गेला.  त्यानंतर मोहनने खुण केल्यावर सुन्या वर चढायला तयार झाला.  तो वर चढणार तेवढ्यात त्याने मोहनकडे पाहीलं आणि त्याच्या पायाखालची जमिन सरकल्यासारखं त्याला वाटलं.  मोहनच्या खांद्यावर त्याची सात वर्षाची मुलगी अंबिका होती.  त्याला काय बोलावं ते कळेना.  तो नुसता डोळे विस्फारुन मोहनकडे पहात राहीला.  
" सुन्या,  चल लवकर... " मोहनने घाई केली.  
" अरे पण,  मोहन हे काय ?  हा तुझा नववा थर ? तुझं डोकं फिरलंय की काय ? "
" मी करतोय ते बरोबर आहे ... "
" मोहन यार,  माझे पाय थरथरतायत.... "
" नेहमी जसा एक्का लावतोस तसा लाव .  चल... टेंन्शन नको घेऊ "
" अंबिकेला काही झालं तर  ?  "
" काही होत नाही .  तु  जास्त विचार करु नकोस "
दोघे एकामागुन एक चढत गेले.  मोहनच्या खांद्यावर त्याची सात वर्षांची मुलगी अंबिका डोक्याला लहानसं हेल्मेट घालुन बसली होती.  तिने मोहनच्या कपाळाला बांधलेल्या फडक्याला घट्ट पकडलं होतं.  दिल्या सहाव्या  थरावर पोचला आणि बसुन राहीला.  त्याच्या खांद्यावर सुन्या बसला.  मोहन त्याच्या मागोमाग होताच !  त्याच्या खांद्यावर अंबिका घट्ट  धरुन बसली होती.  तो दिल्यापर्यंत आला. त्याची   नजर  तो बिलकुल ढळुन देत नव्हता.  तो सुन्याच्या खांद्यावर चढला.  आत तो अत्युच्च शिखरावर होता . खाली सगळे त्याला मुंग्यांप्रमाणे  दिसत होते.  हीच ती उंचीची नशा ! त्याने मनाची एकाग्रता केली.  सुन्याच्या लटपटणाऱ्या खांद्यावर तो स्वतःचा आणि अंबिकेचा तोल सांभाळत बसुन होता.  
' सर्वांनी शांत रहा,  अंबिका व्यायामशाळा थर रचत आहे  ' माईकवरुन सुचना आली.  लोकांनी श्वास रोखले.  हळुहळु दिल्या उठला. ,  त्याच्यानंतर सुन्या उठायचा प्रयत्न करु लागला पण टेन्शनमुळे त्याला निट उठता येईना.  

" सुन्या गोंधळु नकोस,  आरामात उभा रहा. तु करु शकतोस ",   मोहन त्याला धीर देत होता.  कसाबसा जोर लावुन दिल्याच्या हाताचा आधार घेत तो थरथरत उभा राहीला.  खाले लोक पडणाऱ्यांना सावरण्यासाठी हात उंच करुन उभे राहीले.  आता मोहन त्याच्या खांद्यावरुन  हळुहळु  सरळ रेषेत उठु लागला , उठताना खांद्यावर  अंबिका असल्याने त्याचा तोल जाताजाता त्याने स्वतःला सावरलं . खालच्या उभ्या असलेल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकला.  आता मोहन पुर्णपणे उभा राहीला.  त्याने क्षणाचाही विलंब न लावता खांद्यावरच्या अंबिकेच्या पायावर दोन टिचक्या मारल्या.  हि तिच्यासाठी खांद्यावर उभी रहायचा खुण होती.  ती अलगद सरळ रेषेत उठली.  मोहनने तिचे दोन्ही पाय खांद्यावर घट्ट पकडले होते,  तरी तिचे पाय थरथरत होते.  ती पुर्ण उभी राहीली,  आणि कृष्ण जसा बासरी वाजवतो,  तशी बोटांची रचना केली.  लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  त्यानंतर काय झालं कळालं नाही.  भुकंप झाल्यासारखे पायाखालचे सगळे थर गडगडले,  वरचे चारही एक्के एका क्षणासाठी हवेत होते.  त्यानंतर ती रांग जशीच्या तशी बाणासारखी खाली आली. एकच कल्लोळ उडाला.  एकमेकांच्या अंगावर लोळत थरांवरची पोरं खाली खाली जात राहीली.  मोहन,  सुन्या  त्या गोंधळात गर्दीत चेंगरले गेले.  मोहनच्या खांद्यावर अंबिका नव्हती.  कुणाचा पाय तोंडावर,  कुणाचं डोकं खाली आणि वर पाय,  कुणी साफ आडवा झालेला ,  कसल्याही अवस्थेत पोरं एकमेकांवर पडली.  ठरल्याप्रमाणे काही लोक एकमेकांच्या अंगावर पडलेल्या पोरांना खेचुन बाजुला करण्याचे काम करत होते.,  खाली पडलेल्यांना उचलत होते.  सर्व जण एकमेकांपासुन बाजुला झाले.  मोहन इकडे तिकडे पाहु लागला.  अंबिका त्याला कुठेच दिसेना ... ह्या भल्या मोठ्या  कोलाहलात ती कुठे पडली असेल ? ती नीट असेल ना ?  की आपल्या पहील्या मुलाप्रमाणे तिही .....?  नाही ....  नाही ....!  विचार करुन तो वेड्यासारखा तिला शोधत फिरु लागला,  तिला हाका मारु लागला.  पण ती कुठेच दिसेना.  तो सुन्याला शोधु लागला ,  त्याचाही कुठे पत्ता नव्हता.  इतक्यात चारी बाजुंनी टाळ्यांचा कडकडाट ऐकु आला.  त्याने पाहीलं,  सुन्याच्या खांद्यावर उभी राहुन अंबिका सर्वांना अभिवादन करत होती .  




माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7


रविवार, १३ जुलै, २०१४

बस जिंदगी युहीं गुजर जाय...



                                                          छोटासा मकान हो
उसमेही सुकुन हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय...

किसीसे प्यार हो
उसीपे ऐतबार हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय ...

छोटासा कारोबार हो
खुशीयोंकी भरमार हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय ...

कुछ  सवाल सतातें हो
कुछ अनकहीं बातें हो
बस जिंदगी युहीं  गुजर जाय.....

दिल मे बहोतसी तमन्नाऐं हो
सभी नही पर, कुछ तो पुरी हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय....

दोस्तोंमे प्यार हो
दुश्मन भी कभी यार हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय....

बेफिक्र सुबह हो
चैनसे शाम ढलती हो
बस जिंदगी युहीं गुजर जाय....



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7