गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १३…

 
झोजी ला .... लडाख प्रदेश आणि काश्मिर प्रदेश  यांना जोडणारा घाट... त्याबद्दल असं ऐकलं होतं की तो पास  अतिशय अरुंद ,  खतरनाक आहे आणि दिवसाचे काही तास कामकाजामुळे बंद असतो...  विजय स्मारकावरुन निघुन आज आम्हाला राञीपर्यंत श्रीनगर गाठायचं होतं. पण मधे वाटेत झोजी -ला शी सामना करायचा होता... झोजी ला पास कडे जात होतो समोर पाहतो तो सबंध आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आलेलं दिसलं... जोरदार पाऊस पुढे पडताना दिसत होता...काश्मिर खोऱ्यातला सगळा पाऊस एकवटुन इथंच पडतोय की काय असं वाटण्याजोगा धुंवाधार पाऊस समोर पडताना दिसत होता.  मला पुन्हा त्या फुटुला  पासमधल्या हाडं गोठवणाऱ्या पावसाळी थंडीची आठवण झाली आणि अंगावर  काटा उभा राहीला.... समोरच्या पर्वतावर  बरसणारा तो पाऊस बघुन आम्ही थोडं थांबलो. निसर्गाच्या सामर्थ्यापुढे आमचं काय चालणार होतं...?  रेनकोट अंगावर चढवले. हळुहळु पुढे निघालो. पण पुन्हा आमचा पोपट झाला... जसा घाट चढायला लागलो तसा पाऊस गायब झाला आणि लख्ख ऊन पडलं... झोजीला मधे एक विशेष होतं की तिथे डोंगरांच्या कुशीत सर्वञ लांबच लांब हिरवीगार कुरणे दिसत होती....गालिचा अंथरल्यासारखी...अगदी बालकवींच्या कवितेसारखी.... 




बरेच मेंढपाळ आपल्या काश्मिरी शेळ्या मेंढ्यासोबत आनंदाने बागडत होते... क्षणातले रौद्र वातावरण  दुसऱ्या क्षणी आल्हाददायक बनले होते... काय म्हणावं आता इथल्या निसर्गाला...!  कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत आम्ही निघालो. काही ठिकाणी बर्फाच्या ताशिव भिंती रस्त्याच्या दुतर्फा प्रेक्षकांसारख्या उभ्या होत्या ... आम्ही थोडं अंतर पुढे जातो न जातो तोच....काय झालं असेल ?  ...सांगायलाच नको...  पुन्हा गाड्यांची रांग...काम चालु  रस्ता बंद...!  


                                    

आम्ही जवळपास दुपारी १ च्या सुमारास तिथे पोहोचलो असु. आता ३ वाजता हा मार्ग मोकळा करण्यात येईल असे तिथले पहाऱ्यावर असलेले सैनिक म्हणाले... तब्बल दोन तास वाट पहावी लागणार होती... आमच्या बरोबर तसे बरेच लोक अडकले होते. दोन तास ह्या वैराण घाटात बसुन काय करणार...?  आजुबाजुला फिरायला जागाही नव्हती... मुळातच झोजी ला  मधुन एकच गाडी जाऊ शकेल इतका अरुंद रस्ता होता, एका बाजुला उंच कडा आणि दुसऱ्या बाजुला खोल दरी... मागे गाड्यांच्या रांगा... काय फिरणार...? आम्ही थोडा वेळ तसेच बसलो. काही लोक त्यांच्या गाड्यांबाहेर  आले आणि दोन तीन तासांची निश्चिंती असल्यामुळे पथारी टाकुन मस्तपैकी आडवे झाले... सुखी प्राणी... काही जणांनी तीन दगडांची चुल मांडुन त्यावर चहा कराय़ला सुरुवात केली... कोणतीही परिस्थीती येवो माणुस आपला गुणधर्म काही सोडत नाही. आपण काय टाईमपास करावा ह्या विवंचनेत असताना पप्याने त्याच्या बॅगेतुन पत्ते काढले.... आणि आमची सुटका केली... तीनपत्ती खेळण्याचा ठराव पास झाला...आणि पैसे म्हणुन प्रत्येकाने २०-२० खडे वापरायचे ठरले... काय गमतीदार परीस्थीती पहा... आम्ही घरापासुन सुमारे 3000 किमी लांब झोजीला मधे बसुन पत्ते खेळणार आहोत हे कुणाच्या स्वप्नातही आलं नसतं... पण ते घडत होतं. पियु ला तीनपत्तीचे रुल्स माहीत नव्हते पण पोरीचं ऩशीब जोरावर होतं... जवळपास सगळे गेम तिने आणि खोप्याने जिंकले...माझ्याजवळचे खडे संपायला आले की मी हळुच आजुबाजुचे खडे गोळा करुन ते कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीने वापरत होतो... तीनपत्तीच्या खेळात कसली इमानदारी दाखवायची...?  ते पप्याच्या लक्षात येणार तेवढ्यात आम्ही बसलो होतो त्या बाजुच्या कड्यावरुन काही खडे खाली पडले... आधी वाटलं की कोणीतरी मस्करी करतंय पण थोड्या वेळाने जास्तच खडे पडु लागले... वरचा कडा अंगावर ढासळणार या भितीने आम्ही जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला आणि पळत सुटलो... आमची धावाधाव बघुन आजुबाजुचे लोकही घाबरले आणि पळु लागले...जे झोपले होते ते तडफडुन जागे झाले...गाडीत होते ते गाडीतुन बाहेर पडुन सैरावैरा पळु लागले.  हा प्रांत म्हणजे वेड्याचा झटका आलेल्या माणसासारखा आहे... कधी काय होईल ते सांगता येत नाही... ह्या पळापळीत आमचे काही पत्ते  उडुन समोरच्या दरीत पडले...चोरटा जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची धाड पडल्यावर जशी होईल तशी धावपळ झाली... पण आमची भिती  निरर्थक होती... काहीच झालं नाही... पण त्या कड्याखाली बसायचं धाडस नंतर कुणाला होईना... बराच वेळ रस्ता बंदच होता... भुकही लागली होती ...हा रस्ता कधी मोकळा होईल असं झालं... शेवटी आमची प्रतिक्षा संपली... आम्ही गाड्या काढल्या खऱ्या पण पुढचा रस्ता बघुन तो बंद होता तेच चांगलं होतं असं वाटायला लागलं...सगळा रस्ता मातीचा... आणि नुसता मातीचा नाही तर मोठमोठे खड्डे असलेला ... ओबडधोबड... बाजुला आमच्याकडे अधाशीपणे पाहाणारी  खोल दरी तिच्याकडे आकर्षित करीत आहे असं वाटत होतं.. फार जपुन गाडी चालवावी लागत होती... आम्ही घाटात समोर लांबवर पाहीलं... समोरुन येणाऱ्या गाड्यांची भलीमोठी रांग दिसली... जसे आम्ही ह्या बाजुला थांबलो होतो तसे त्या गाड्या पलीकडे थांबल्या होत्या ... झोजीला मधे काही ठिकाणी समांतर रस्ते होते ... त्यापैकी एका ठिकाणी रस्ता चुकलो,  वरुन काम चालु असल्याने काही ठिकाणी दगडांचा वर्षाव,  चिखलाचा राडा, गाडी घसरणे असल्या प्रकारांना तोंड देत आम्ही कसेबसे झोजी ला उतरलो... खाली येऊन पहातो तो मुंग्यांचं वारुळ फुटावं तशी सर्वञ माणसं आणि गाड्या... मुंबईमधे लोकल्स लेट झाल्यावर होते तशी तोबा गर्दी.… ! हे सर्वजण अमरनाथ याञेसाठी आलेले होते...त्यांच्यातुन वाट काढत आमचे रायडर्स सुसाट निघाले... खाली आम्हाला सोनमर्ग हे ठिकाण लागलं. तिथे आलो त्यावेळी पोटात काकयुद्ध सुरु झालं होतं... मग एका हॉटेलात मस्तपैकी मॅगी हाणली... आणि जरा आराम केला...मी सहज मागे पाहीलं., मागचा झोजीला चा डोंगर मावळतीच्या प्रकाशात सोन्यासारखा  उजळुन निघाला होता... आपले सोनमर्ग हे नाव सार्थ करत होता... 



खाणंपिणं झालं....गाड्यांवर टांगा टाकल्या ...आणि श्रीनगर च्या दिशेने निघालो... ते अंतर जवळपास ७० -८० किमी होतं ...पुढचा रस्ता तसा चांगला दिसत होता... आणखी दोन तासाचा प्रवास ... आम्ही सुसाट गाड्या सोडल्या. रस्त्याने जाताना मधेच एक चारचाकी गाडी आमच्या बाजुने पुढे जात असताना  " नमस्कार  ओ कल्याणकर ... " अशी हाक ऐकु आली. गाडीचा नंबर MH 05 असल्याने आम्ही कल्याण च्या जवळपासचे असु असा अंदाज  करुन गाडीतला तो  माणुस आम्हाला all the best...देत होता... आम्हीही त्याला प्रतिसाद दिला.  खरं तर आमची आणि त्याची ओळख असण्याची कोणतीच शक्यता नव्हती. तरीही त्याने आम्हाला हाक मारली... हाच माणुस जर महाराष्ट्रात कुठे भेटला असता तर त्याने आमच्याकडे बघितलंही नसतं...अनोळखी प्रदेशात आपल्याकडचा अनोळखी माणुसही जवळचा वाटतो... आता श्रीनगरला कसे पोहोचलो  ह्यात काही  सांगण्यासारखं नाही.... फक्त  अमरनाथ याञेमुळे रस्त्यावर मरणाचं ट्रॅफिक होतं.... श्रीनगर मधे आलो त्यावेळी तिथं वातावरण ठिक नव्हतं ...कर्फ्यु लावला होता.... त्यामुळे राञी शहरात न जाता बाहेर हायवेवरच्याच एखाद्या हॉटेलात रहावे म्हणजे  कर्फ्यु मधे न अडकता सकाळी लवकर निघता येईल असा विचार करुन आम्ही शहराबाहेरच राहीलो... रात्री झोपायच्या तंद्रीत असतानाच खोप्या आणि पियू हातात लहानसा केक घेऊन आमच्या रूम मध्ये आले… रात्रीचे १२ वाजले होते … २७ तारीख … माझा वाढदिवस होता जो ह्या धावपळीत माझ्याही लक्षात नव्हता … पण बाकीच्यांनी आठवणीने सगळी तयारी केली होती … केक-बिक खाल्यानंतर खोप्या , संदीप , पप्या आणि पियू यांनी जी भेटवस्तू दिली , ती बघून तर मला काय बोलावं तेच कळत नव्हतं … मी माझ्या अल्पमतीने लिहिलेल्या blog च्या प्रिंट काढून ते पुस्तक रुपात माझ्या हाती दिलं … आईला आपलं नवजात बाळ पहिल्यांदा पाहिल्यावर जसं वाटत असेल तसंच काहीसं त्यावेळी मला वाटलं … काय बोलणार ? धन्यवाद मित्रांनो …!!!




1 टिप्पणी: