सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

दुचाकी लडाखायण ... भाग - ७

     
                          आईशप्पथ ....!!  जाम दम लागतोय ... माझं  काही खरं  नाही...
                           
                          अरे यार कधी संपणार हा रस्ता ....??
                             
                          ओ  माय  गॉड ....

                          सरजी ,   थोडा पाणी मिलेगा ...??

                          आयचा घो ... ते बघ  पुढे रस्ता बंद आहे ... गाड्यांची रांग लागलीय...

                          पुढे ब्लास्टिंग करणार आहेत.... ७ ब्लास्ट आहेत ... एक - दीड तास लागणार....आपण                                                                   अडकलो  .... आता वाट ...!!!  

                                                               ... टांगलांग- ला....  ( उंची  १७५८२ फुट ...)                                                                                                                 
                                                    ( एकही फोटो नाही.... )
       
                                                                           @
                                                                           @
                                                                           @

                    साला एखादा दिवसच खराब असतो... इतका खराब ,  कि आपण पुढचे दिवस बघायला जिवंत राहू कि नाही याची शंका येते... अजूनही तो दिवस आठवला कि श्वास जड झाल्या सारखं  वाटतं ...
  माणसाच्या आयुष्यातला चांगला काळ  जसा झरकन सरतो तसा तो मख्खन रस्ता लगेच संपला .. आणि सुरु झाला तो तुकड्या तुकड्यातला रस्ता ... म्हणजे १०० -१५० मीटर रस्ता आणि मध्ये बारीक माती ...!  इतकी  कि त्यात गाडीचे टायर  रुतून बसत ...  बॉर्डर रोड   ऑर्गनायझेशन च्या  जवानांनी मोठ्या  कष्टाने  हा रस्ता तयार करायला घेतला आहे ... आणि काही  ठिकाणी जवान स्वतः उभे होते . उन्हातान्हाची परवा न करता गाड्यांना ते रस्ता दाखवत होते जेणेकरून गाड्या मातीत अडकू नयेत... धन्य ते जवान ! एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ते सहज फिरायला म्हणून येणाऱ्या पर्यटकांसाठी आपलं  कर्तव्य बजावत होते. असंच अर्ध  अंतर पार केल्यानंतर आम्हांला कळलं  कि आम्ही  ' मोरे प्लेन ' ( morey plains ) मधून जात आहोत. नजर जाईल तिथवर सपाट समतल प्रदेश ...
                खरं  तर ह्या मोरे प्लेन मध्ये शिरण्याआधी पासूनच मला पुन्हा त्रास व्हायला लागला...  लडाखला निघालेल्या पाच जणांपैकी मी सगळ्यात ' कमजोर कडी ' होतो ... खोप्या , संदीप , पप्या हे तर इतक्या अवघड रस्त्यांवरून बाईक चालवत होते , मानलं  त्यांच्या एकाग्रतेला....आणि चिकाटीला ...!   पियू एक मुलगी असूनही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही  बाईक राईड  एन्जॉय  करत होती ... मला ह्या सगळ्यांच्या मनोधैर्याचा हेवा वाटू लागला...
                   मोरे प्लेन मधून जात असताना एका ठिकाणी मला इतकं  अस्वस्थ वाटू लागलं  कि मी बाईक वरून खाली पडतो कि काय अशी शंका यायला लागली ....एके ठिकाणी थांबलो , रोड ची कामे करणाऱ्या माणसांसाठी तात्पुरते तंबू उभारले होते , तिथे संदीप आणि खोप्या आसरा मिळतो का ते पाहायला गेले , त्या कामगारांनीही  मोठ्या अगत्याने आम्हाला त्यांच्या तंबू मध्ये आराम करण्यास सांगितले ... त्यांचा तो तंबू म्हणजे दुसरी भट्टीच होती ... पण तिथे थोडा वेळ आडवा झालो , खोप्याने मला कापराच्या २-३ वड्या दिल्या त्या हुंगल्याने जरा बरं  वाटलं ... त्या तशाच रुमालात बांधून मी नाकासमोर तो रुमाल बांधला... थोड्या वेळाने  बरं वाटू लागलं ... खोप्याचा हा उपाय खरच चांगला होता ....आता जास्त वेळ थांबून चालणार नव्हतं .... अजून बरंच अंतर आम्हाला पार करायचं  होतं ... तिथून निघणं   अतिशय जीवावर आलं  होतं ...सपाट रस्ता काही केल्या संपत नव्हता , त्यात रस्त्याचं  काम चालू असल्याने गाडी चालवायला फार त्रास होत होता ... अनेक वेळा त्या मातीच्या रस्त्यावरून आमच्या गाड्या घसरत होत्या , पुढे  चाललेल्या गाडीचा धुरळा  मागे उडत होता ,  त्यामुळे पुढच काहीच नीट  दिसत नव्हतं , गाडी हळू चालवली तर मातीत रुतत होती आणि फास्ट चालवली तर मातीवरून घसरत होती , त्यामुळे गाडी चालवावी तरी कशी ....? असा प्रश्न आमच्या रायडर्स पुढे होता ...एक वेळ तर अशी आली कि रस्ताच नव्हता , नुसती बारीक माती ...' तुम्हाला  कुठून जायचंय तिथून जा....' अशीच मुभा जणू निसर्गाने दिलेली ...!!!
                     थोड्या वेळाने आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो , आमच्या समोरून आर्मी चा कॉन्वोय येत होता ... ५०-६०  आर्मी च्या गाड्या ....आम्ही बाजूला थांबलो ... मी आणि संदीप ने त्यातल्या जवानांना salute  केला .. त्यांनी त्याचा  स्वीकार करून आम्हालाही  salute  केला ... केवढा तरी अभिमान वाटला आम्हाला ...!!  त्यांच्यातल्या एका जवानाने गाडीची नंबर प्लेट बघितली आणि   " जय महाराष्ट्र..."  केलं ... फक्त दोनच शब्द....! हजारो किलोमीटरच्या अंतराचं अवडंबर एका झटक्यात गळून पडलं ... आणि आम्ही महाराष्ट्रातच आहोत कि काय असा क्षणभर भास झाला .... जाता जाता त्यांनी   " मुंबईचे का...?? " असं  विचारलं. आम्हीही त्यांना उत्साहात होकार दिला... ते ट्रक पास होईपर्यंत आम्ही थांबलो... पुढे निघालो तशी चढण सुरु झाली ... एका मागोमाग एक वळणे , खडबडीत रस्ता , अंगातला अणु -रेणू थडथडत होता., त्यात श्वास घ्यायला त्रास ... बेकार हालत  झाली होती ... टांगलांग -ला पास ...!! रस्त्याची एक खासियत होती , एक वळण घेतलं  कि समोर लांबच लांब चढणीचा रस्ता दिसायचा... त्या शेवटच्या टोकावर पोहोचून  वळण घेतलं  कि समोर पुन्हा तसाच लांबच लांब रस्ता....असं  किमान ७-८ वेळा झालं  असेल....टेप  रेकॉर्डर मधली कसेट अडकली कि कसा तोच तोच आवाज येतो तसाच विधात्याच्या टेप  रेकॉर्डर मधली कसेट अडकली कि काय असं वाटू लागलं ... वळण घेतलं  कि तेच तेच दृश्य समोर ...!! असा वैताग आला ... कधी संपेल हा रस्ता ?? सगळेच  बेजार झालो ... त्यात आमच्याकडचे पाणीही संपले ... कसेबसे वर पोहोचलो... वर  वारा  तर वेड लागल्यासारखा सुसाट सुटला होता ...   तहानेने सगळेच कासावीस झाले होते . एक आर्मीची जिप्सी गाडी उभी होती ... त्यांना खोप्या ने थोडं  पाणी मिळेल का म्हणून विचारलं ... त्यांच्याकडेही फारच थोडं  पाणी शिल्लक होतं . तरीही त्यांनी आम्हाला त्यातलं  पाणी प्यायला दिलं... औदार्य म्हणतात ते ह्याला !!  त्या तिथे इतकं  अस्वस्थ वाटत होतं  कि ' टांगलांग - ला ' लिहिलेल्या त्या पाटीसमोर उभं राहून फोटो काढण्याची इच्छाही कोणाला झाली नाही ... टांगलांग - ला मध्ये आमचा जीव टांगणीला लागला होता ... लवकरात लवकर तिथून निघावं  म्हणून आम्ही लगेच गाड्यांवर टांगा  टाकल्या ... पुढचं  एक वळण घेतो न घेतो तोच समोर जे दृश्य दिसलं  त्याने तर माझा होता नव्हता तो धीरही सुटला ... समोर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या ...  आता जिथे श्वास घेणंही जड जात होतं  तिथे आम्हाला नाईलाजाने थांबावं  लागणार होतं ...गाड्या रस्त्याच्या बाजूला लावल्या , मी तर रस्त्यावर सरळ आडवाच झालो... एक प्रकारची ग्लानी आणि अस्वस्थता मला जाणवत होती... पप्या  संदीप , खोप्या आणि पियू सुद्धा रस्त्यावर बसले ... मी डोळे मिटून पडून राहिलो... अर्धवट ग्लानीमध्ये काही काही वाक्ये ऐकायला येत होती ...
-- " पुढे ब्लास्टिंग करणार आहेत.... ७ ब्लास्ट आहेत ... एक - दीड तास लागणार....आपण                                                                   अडकलो  .... आता वाट ...!!!  "
-- " रस्ता रुंद करण्याच काम चालू आहे ...."
-- " अरे तो बघ , बिडी ने सुरुंगाची वात  पेटवतोय.... "

                                                 ...... टिक  टिक  ... टिक  टिक

                           ध s  डाम ....  ध s  डाम ......  ध s  डाम  
               एका पाठोपाठ किती ब्लास्ट झाले मला समजलं  नाही ... पण प्रत्येक धमाक्यानंतर मी आडवा पडलो होतो ती जमीन धरणीकंप झाल्यासारखी हादरत होती... हे असले धमाके ह्या हिमालयाला काही नवीन नाहीत... मग ते विधायक असोत कि विघातक ... त्याने ते सारे सहन केले  ,  अजूनही करतोय ... आणि आणखी किती काळ  सहन करावे लागतील , देव जाणे ...!  त्या धमाक्याने मी भानावर आलो... खोप्याने मला दिलेली कापराची वडी  नाकाला लावली ... बरं  वाटलं . खरंच , हा उपाय नक्कीच काम करत होता ... त्यावेळी  खोप्याने मला तो प्रथमोपचार दिला नसता तर मी नक्कीच मेलो असतो... आमच्याकडे पाणी नसल्याने खोप्याने  आजूबाजूचा बर्फ बाटलीत टाकून ते वितळवून पाणी तयार करण्याचा एक  अयशस्वी प्रयत्न केला... आमचं  बोलणं ऐकून तिथे पाण्याचा tanker  घेऊन जाणारा एक माणूस जवळ आला .. तो बुलढाण्याचा होता त्याने लांबवर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीतून थोड पाणी आम्हाला दिलं . ती गाडी आमच्यापासून फारतर ५० फुट लांब असेल , पण तिथून ते पाणी घेऊन येताना पप्या अगदी मेटाकुटीला  आला . तो जवळ आला , पाण्याची बाटली दिली आणि गाडीवर ओणवाच झाला ... तिथलं  वातावरणच असं  भयानक होतं ... थोड्या वेळाने रस्ता मोकळा झाला , आणि आम्ही निघालो ... रस्त्यावर पाणी आणि चिखलाचा राडा झालेला ... कसेबसे  त्या रस्त्यावरून  आम्ही निघालो ...काही अतिउत्साही रायडर्स आमच्या बरोबर होते ... इतक्या खराब रस्त्यांवर ते कशीही गाडी चालवत होते , एक जण तर रस्त्याला अगदी दरीच्या बाजूने जाता जाता अचानक गपकन खालीच गेला  ... अति आत्मविश्वास ... म्हणजे ज्याला नेहमीच्या भाषेत , ' शानपना ' म्हणतो तो नडला ... पण नशीब चांगलं  म्हणून ते जास्त खाली घसरले नाहीत ...'  पुढच्यास ठेस मागचा शहाणा  ' ह्या म्हणीच्या शब्दशः अर्थाने आम्ही हळूहळू गाडी चालवत टांगलांग - ला  उतरलो ...संध्याकाळी  ६ च्या सुमारास  खाली रुम्त्से नावाच्या  गावात  पोहोचलो ...अतिशय टुमदार गाव होतं  ते ...!! तिथे बसून थोडा श्रम परीहार केला... चहा  नाश्ता घेतला... सगळे इतके थकले  होते कि पुन्हा गाड्यांवर बसू वाटत नव्हतं... लेह अजूनही ६० - ७० किलोमीटर लांब होतं ... पुढे उप्शी या ठिकाणी थांबावं  कि डायरेक्ट लेह गाठावं अशी द्विधा मनस्थिती सगळ्यांची झाली ... कारण सगळेच जाम दमले होते ...
                         शेवटी गाड्यांवर बसलो ... पुढचा रस्ता अगदीच मक्खन होता ... आणि आम्ही  लेहला जायचा निर्णय घेतला ....  मध्ये पप्याला बरं वाटत नसल्याने त्याने गाडी माझ्याकडे दिली ...  मला एक  चांगलं  वाटलं  कि लेह मध्ये जाताना मी स्वतः गाडी चालवत होतो...  गया  , उप्शी , करू , थिकसे , शे  अशी गावे पार करीत आम्ही लेह कडे मार्गक्रमण करु लागलो  ... लेह कडे जाताना रस्त्यात एक लहानसे वादळ झाले...अंधार पडला ....  झाडे आपली पाने आमच्यावर बरसवीत होती ... मायथोलोजिकल  सिरीयल मध्ये आनंदाच्या प्रसंगी जसे स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला जातो तसंच काहिसं आम्ही लेह मध्ये पोहोचताना झालं ... फरक इतकाच होता कि इथे फुलांच्या ऐवजी झाडांची वाळलेली पाने आणि  धूळ  होती... पण काही का असेना तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता ...
                          इतका भयानक , खडतर प्रवास.... एक लहानसा अपघात .... टांगलांग - ला मध्ये झालेल्या मरणप्राय यातना.... हे सर्व पार करून आम्ही अखेर आमच्या 'मंजिल ' ला पोहोचलो होतो ... पण नंतर थोडा विचार केला , आणि लक्षात आलं  कि लेह तरी आपली ' मंजिल  ' कुठे आहे ...??

                             ये तो ऐसा सफ़र है जहां  रास्ते ही मंजिल है ....।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा